सहायक अभियंत्याची तत्परता आली कामी
marathinews24.com
दौंड – विद्युत उपकेंद्रातून होणाऱ्या भूमिगत केबलच्या दोषामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. अखेर २४ तासानंतर ६ गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली, खडकी, रावणगाव, नंदादेवी, मळद आणि लोणारवाडी या गावांचा वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित झाला होता. मात्र कुरकुंभचे सहायक अभियंता मुंघसे आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांमुळे २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांनी अधिकाऱ्यांसह कामगारांचे कौतुक केले आहे.
पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासकडून दिवसरात्र वैद्यकीय सेवा – सविस्तर बातमी
भिगवनमधील सब स्टेशनमधून संबंधित गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, भूमिगत केबलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भूमिगत केबल कायमस्वरूपी काढून टाकून विद्युत खांब उभे करून नवीन लाईन बसवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मागणीला प्रशासनाने होकार दिला असून, नवीन विद्युत खांब लाईन उभारण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. येत्या आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन सहाय्यक अभियंता मुंघसे यांनी दिले आहे. कामावेळी स्वामी चिंचोली गावचे सरपंच मच्छिंद्र मदने, अभियंते नीलेश शिंदे, ज्ञानेश शिंदे, वायरमन ढवळे, ठेकेदार प्रशांत राणवरे, इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली दखल
वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची दखल बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, संबंधित कामाला गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.























