भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात घडली घटना
marathinews24.com
पुणे – मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून मित्राने एकावर कोयत्याने वार केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आदित्य सुनील कांबळे (वय २०,रा. एस. के. रेसीडन्सी, नवले पुलाजवळ, नऱ्हे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चेतन बाजीराव कांबळे (वय २३, रा. समर्थ काॅम्प्लेक्स, धनकवडी) याला अटक करण्यात आली. आदित्यने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यातील संगमवाडीत टोळक्याचा राडा; हवेत शस्त्रास्त्रे फिरवली, ६ जणांना अटक – सविस्तर बातमी
‘आदित्य आणि चेतन हे मित्र आहेत. दोघांची एका तरुणीसोबत मैत्री होती. मंगळवारी (२ फेब्रुवारी) आदित्य आणि चेतन हे भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात रात्री आठच्या सुमारास भेटले. त्या वेळी आदित्यने चेतनच्या मोबाइलवरुन तरुणीशी संपर्क साधला. या कारणावरुन त्यांच्या वाद झाला. त्यानंतर चेतनने शेजारी असलेल्या रसवतींगृहातील कोयता घेतला. कोयत्याने आदित्यवर वार करण्याचा प्रयत्न केला’, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी दिली. त्यानंतर आदित्य घाबरुन तेथून पळाला. चेतनने त्याचा पाठलाग करून त्रिमूर्ती चौकातील एका गल्लीत कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
गजबजलेल्या त्रिमूर्ती चौकात ही घटना घडल्याने घबराट उडाली. चेतन तेथून पसार झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या आदित्यला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपी चेतनला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत .





















