अतिवृष्टीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नागरिकांची जेवणासह पिण्याच्या पाण्याची अनेक ठिकाणी व्यवस्था
marathinews24.com
बारामती – अतिवृष्टीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेलेले होते, अशा आपद्ग्रस्थ नागरिकांसाठी नगरपरिषदेमार्फत १४ ठिकाणी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पंकज भुसे यांनी दिली आहे.
नगरपरिषदेमार्फत जळोची, तांदुळवाडी, रुई, कल्याणी नगर, कसबा- पतंगशाहनगर-शारदा प्रांगण येथील नगरपरिषद शाळा, शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळा, पंचशीलनगर समाज मंदिर या ठिकाणी राहण्याची सोय केली होती. प्रत्येक ठिकाणी नगरपरिषदेचे ३ कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. या ठिकाणी जवळपास २०० नागरिकांची राहण्याची तसेच शहरातील एकूण ६५० नागरिकांची जेवणासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली, याकामी शहरातील नागरिक व विविध पदाधिकाऱ्यांचे देखील वेळोवेळी सहकार्य मिळाले आहे.
अतिवृष्टी झाल्यामुळे प्रामुख्याने जळोची ओढ्यालगतच्या घरांना फटका बसला असून शहरात एकूण ७० घरांमध्ये पाणी शिरले असून असून २५ घरांची अंशतः पडझड झालेली आहे. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने जळोची येथील ओढ्यात वाहून जाणारा एक इसम व काटेवाडी येथील एका कुटुंबातील ७ नागरिकांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले.
शहरातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बारामती नगरपरिषदेच्या ८५५४९ २२४९४ या व्हाट्सॲप क्रमांकावर अथवा ०२११२-२२२३०७/२२२४९४ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही भुसे यांनी केले आहे.