बसव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘समग्र बसव क्रांतीचा जाहिरनामा’ पुस्तकाचे प्रकाशन
marathinews24.com
पुणे – महात्मा बसवेश्वर हे काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे होते. त्यामुळे त्यांचा विचार हा क्रांतीकारक विचार आहे. तोच आजच्या युगात गरजेचा आहे, असे ठाम प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
“आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे…” — आंदेकर कुटुंबातील मुलींची भावना – सविस्तर बातमी
बसव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी लिंगायत दिनदर्शिका आणि ‘समग्र बसव क्रांतीचा जाहिरनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सबनीस उपस्थित होते. या वेळी बसवपीठावर ज्येष्ठ विचारवंत बाळासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप बर्वे, नलिनी वाघमारे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सचीन लकडे, संतोष मलशेट्टी, संजय इंडे, शिवा इंडे, नागेश इंडे, रवींद्र खुबा, शिवशंकर बिराजदार, संगमेश खुबा उपस्थित होते. डॉ. नीतू मांडके सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या अलौकीक अशा कार्याचा समग्र आढावा घेतला. ते म्हणाले, बाराव्या शतकातील हे क्रांतीकारक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी लिंगायत धर्माची व्याप्ती विश्वधर्मापर्यंत नेली. त्यांनी श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. त्यांचा विचार हा मार्क्सपूर्वीचा मार्क्सचा विचार होता. त्यामुळेच बसवण्णांची पूर्वपुण्याई मोठी आहे. त्यांनी श्रमातून अध्यात्माची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. समता, सत्य, अहिंसेला महत्त्वाचा मानणारा धर्म त्यांनी सांगितला. जगातील हिंसक प्रवृत्ती मग ती कुणाचीही असो ती हानीकारकच असते. ही मांडणी महात्मा बसवेश्वरांनी केली. त्यांचे विचार व अध्यात्म क्रांतीकारक होते. वर्णभेद, जातीभेद यांना त्यांनी विरोध केला. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटावा असा हा लोकशाहीची जपणूक करणारा क्रांतीकारक महात्मा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
डॉ. सबनीस म्हणाले, स्त्री मुक्तीची संकल्पना बसवेश्वरांच्या विचारांतून दिसून येते. वर्णव्यवस्थेसह त्यांनी वर्गव्यवस्था नाकारली. माणसाचे माणूसपण त्यांनी महत्त्वाचे मानले. स्त्रीला त्या काळात धार्मिक आध्यात्मिक हक्क देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आजचे राजकारण, धर्मकारण भ्रष्ट झाले आहे. तेव्हा शुद्ध विचार, शुद्ध धर्म यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची कास धरूनच आपल्याला पुढे जावे लागेल. समाजाच्या उन्नतीवर भर देणारे बसवेश्वरांचे विचार आजही उपयुक्त आणि महत्त्वाचे आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात मनापासून मेहनत घेणारे कार्यकर्ते संतोष मलशेट्टी यांचा डॉ. सबनीस यांनी विशेष सन्मान केला. व तसेच या कार्यक्रमासाठी संजय इंडे सरांनी विशेष सहकार्य केले नलिनी वाघमारे व डॉ.सचीन लकडे सर यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र खुबा यांनी सूत्रसंचालन केले तर नंदिनी पाटील यांनी आभार मानले.






















