जरांगे पाटील यांचे राजकीय घडामोडींवर मत
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही काटा काढला आहे, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. परळी तालुक्यातील मिरवट येथील हरिनाम सप्ताह सोहळ्याला त्यांनी शनिवारी (दि.१७) भेट दिली. यावेळी जरांगे पाटील यांनी राजकीय घडामोडींवर मत व्यक्त केले.
जरांगे पाटील म्हणाले, अजित दादांनी पापी लोक सोबत ठेवले, म्हणूनच मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला आहे. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना जे अपयश मिळाले, ते केवळ मराठा मतदारांच्या नाराजीमुळेच मिळाले आहे.तर भाजपवाले फार कलाकार आहेत. त्यांनी पहिली महाविकास आघाडी संपवली. आता शिंदेचा आणि अजित दादाचा काटा काढला. मात्र मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाल्यास ते भाजपला चिरडून टाकतील असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
भाजपने बघायला काही ठेवलंच नाही. अजितदादा पण असे लोक सांभाळत असल्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर जात आहेत. पापी लोक सोबत ठेवले तर असे परिणाम भोगावे लागतील. अजित दादांनी आतातरी समज घेतली पाहिजे. काही वाईट लोक सोबत ठेवले म्हणून मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. भाजप जवळ करत नाही, यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं. दोन नासके सांभाळल्यामुळे मराठा समाज दूर गेला. यामुळे महानगरपालिकेत केवळ मराठ्यामुळेच आपटावं लागलं. एमआयएमच्या यशाबद्दल बोलताना मुसलमान, दलित आणि मराठे एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणूनच २०२९ च्या निवडणुकीत मराठा, दलित, मुस्लिम एकत्र आले की, भाजपला ते चिरडून टाकतील असे ते म्हणाले.एकजुटीचा मंत्र आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा मांडताना त्यांनी पुन्हा ‘मराठा-दलित-मुस्लिम’ या समीकरणाचा पुनरुच्चार केला. हे तीन समाज एकत्र आले की सगळ्यांचा धुरळा उडतो, असे ते म्हणाले.
परळी तालुक्यातील कुणबी प्रमाणपत्रांच्या तक्रारींबाबत आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचचेही त्यांनी नमूद केले. यावेळी ह.भ.प. विष्णू महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहून जरांगे पाटील यांनी अध्यात्मिक ऊर्जा घेतली आणि समाजाला एकजुटीने राहण्याचे आवाहन केले.आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकी पासून अलिप्त राहणार असल्याचे सांगितले.





















