कॅपेक्सला प्राधान्य, रोजगारनिर्मितीवर भर; दीर्घकालीन विकासाचा रोडमॅप – प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी
marathinews24.com
पुणे – केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाला (कॅपेक्स) प्राधान्य देत वित्तीय तूट कमी करण्यावर आणि कर्ज-जीडीपी गुणोत्तर अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला असून, हा अर्थसंकल्प आर्थिक विकास व वित्तीय शिस्त यांचा समतोल साधणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी रविवारी दिली.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पातून देशांतर्गत उत्पादन वाढवणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि विशेषतः युवकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरे व ग्रामीण भाग यांचा समतोल विकास साधत सर्वसमावेशक प्रगतीवर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शेती, मच्छीमार व्यवसाय, दुग्धव्यवसाय व अनुषंगिक क्षेत्रांना चालना देतानाच महिलांच्या विकास व सुरक्षिततेसाठीही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. “युवकांची क्षमता वाढवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे,” असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
संरक्षण साहित्याची देशांतर्गत निर्मिती, अंतर्देशीय जलवाहतूक, रेअर अर्थ मटेरियल कॉरिडॉर, सेमीकंडक्टर्स, सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, बायोफार्मा उपक्रम आणि डेटा सेंटर हब्स ही या अर्थसंकल्पातील महत्त्वाची वैशिष्ट्ये असून, यामुळे भारताची दीर्घकालीन आर्थिक पायाभरणी अधिक मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्या वर्षी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक सातत्य आणि स्थिर आर्थिक नेतृत्वाचे हे प्रतीक असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.





















