कारखाना पाडून मशिनरी चोरुन नेल्याचा आरोप
marathinews24.com
पुणे – शहरातील नामांकित बिल्डर ब्रम्हा कॉर्पच्या संचालकांसह ८ जणांवर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडगाव शेरीतील गीताबाई चाळ ही जागा रात्री ११ वाजता ताब्यात घेताना ब्रम्हा कॉर्पने त्यातील कारखाना व गॅरेज पाडून कारखान्यातील ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी चोरुन नेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिवे घाट ५ फेब्रुवारीला तीन तास बंद – सविस्तर बातमी
पोलिसांनी ब्रम्हा कॉर्प लि. चे करण अगरवाल, अजय अगरवाल, हिमांशु अगरवाल, श्रीनिवास रेड्डी, दत्ता चव्हाण, इसरार खान, संजय सिंग, रवी लुडकत व इतर कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री अकरा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपतराव गुलाबराव पासलकर यांनी वडगाव शेरी येथील कारखाना पाडून जमीनदोस्त करुन कारखान्यामधील सर्व मशीनरी चोरीस गेल्याबाबत तक्रार अर्ज चंदननगर पोलीस ठाण्यात केला होता. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी केला. गीताबाई चाळ येथे ग्रीन स्टार इंजिनिअरींग वर्क्स नावाचा कारखाना १९८० पासून सुरु होता. त्यांनी ही जागा दत्तु गलांडे यांच्याकडून भाड्याने घेतली होती. तेव्हापासून तेथे त्यांनी शीट मेटल्स प्रेस पार्ट, डाईज, जीग फिक्चर यांची कामे करण्याचा कारखाना चालु केला होता. कारखान्यात ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी व कच्चा माल होता. १५ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान ब्रम्हा कॉर्प बिल्डरच्या लोकांनी कारखाना पाडुन मशिनरी चोरुन नेली होती.
सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर १५ जानेवारीला रात्री ११ वाजता पोकलेन मशीन बाहेर येताना व आठ ते दहा कामगार जागेला लोखंडी पत्र्यांचे कंपाऊंड करत असल्याचे दिसून आले. मुमताज रियाज शेख (वय ६२,रा. कामराजनगर, येरवडा) यांचे येथे रियाज अॅटोवर्क्स नावाचे गॅरेज ३५ वर्षांपासून होते. दरम्यान, या जागेचे मुळ मालक धनंजय दत्तात्रय गलांडे (वय ५०, रा. गीताबाई चाळ, सैनिकवाडी, वडगाव शेरी) यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांची तेथे शेती होती. २०२४ मध्ये ब्रम्हा बिल्डर्स यांना आहे त्या परिस्थितीसह विक्री केली होती. या जागेमधील भाडेकरु त्यांना कोणताही मोबदला देत नव्हते. संपतराव पासलकर यांचा कारखाना होता. परंतु, तो मागील १० ते १२ वर्षांपासून बंद होता. पोलिसांनी ब्रम्हा बिल्डर्सच्या कार्यालयाशी संपर्क साधला त्यावेळी त्यांना यांच्याकडून सांगण्यात आले, ब्रम्हा बिल्डर्स यांनी ही जागा १२ नोव्हेबर २०२५ रोजी विकत घेतली आहे.
त्याठिकाणच्या भाडेकरुंकडून परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व चौकशीवरुन गीताबाई चाळ येथील जागा ब्रम्हा कॉर्प लि. चे करण अगरवाल, अजय अगरवाल, हिमांशु अगरवाल यांनी या जागेमध्ये असलेले भाडेकरु यांच्या संमतीशिवाय, तसेच कोणत्याही न्यायालयाचे आदेशाशिवाय अगरवाल यांच्या सांगण्यावरुन इतर आरोपींनी कामगारांच्या मदतीने कारखाना व गॅरेज पाडून टाकले. कारखान्यातील ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी व कच्या माल चोरुन नेला. जागेचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे तपास करीत आहेत.
संपतराव पासलकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार चौकशी करून पोलिसांनी ब्राम्हा कॉर्पचे करण, अजय, हिमांशु अगरवाल यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
- निलेश बडाख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदनगर पोलिस ठाणे
























