९ मोबाईल आणि १२ सिमकार्ड जप्त
marathinews24.com
पुणे – शहरातील धनकवडी परिसरात “अवनी” ज्वलर्स” नावाने दुकान सुरू करून त्याद्वारे सोने स्वस्तात देण्याच्या आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराफी दाम्पत्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दाम्पत्याकडे ९ मोबाईल आणि १२ सिमकार्ड मिळाले आहेत. त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. ज्यांची या दाम्पत्याकडून फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन भारती विद्यापीठ पोलिसांनी केले आहे.
दैवी अवतार असल्याची बतावणी करुन महिलेवर अत्याचार – सविस्तर बातमी
हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५, रा. कात्रज) आणि रुपाली हेमंत खरोटे (वय ३८) अशी अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, सहाय्यक निरीक्षक विश्वास भाबड व त्यांच्या पथकाने केली आहे.
खरोटे दाम्पत्याने धनकवडी परिसरात अवनी ज्वेलर्स या नावाने सराफी दुकान सुरू केले होते. त्यापुर्वी त्यांनी नागरिकांना स्वस्थात सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे गोळा केले होते. त्यांनी तोळ्याला ६० हजार रुपये भाव देऊन सोने देतो अशी बतावणीकरून पैसे उकळले होते. अनेकांना मेकींग चार्जेस लागणार नाहीत. तसेच, दागिन्यांचे व बिस्कीटाचे फोटो मोबाईलवरून दाखवूनही विश्वास संपादन करून नागरिकांकडून पैसे उकळले होते. दरम्यान, याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दाम्पत्य पसार झाले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, ते सापडत नव्हते.
आरोपी ओला कॅबने मुंबई-पुणे प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लागलीच पोलिसांनी महामार्ग परिसरात सापळा लावून त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर दोघे वेगवेगळ्या राज्यात फिरत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे पोलिसांना ९ मोबाईल आणि १२ सिमकार्ड मिळाले. ते सिमकार्ड बदलून काहींच्या संपर्कात राहत होते. तर येथील परिस्थितीची माहिती घेत असल्याचेही दिसून आले आहे. जवळपास २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी ही स्कीम राबवत अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय आहे. ज्या नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांनी केले आहे.
























