इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत झालेल्या या सत्राला पर्यावरणप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती
marathinews24.com
पुणे – ‘जीविधा’ या संस्थेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय हिरवाई महोत्सव अंतर्गत आज दुसऱ्या दिवशी, दिनांक ३१ जुलै रोजी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. अंकुर पटवर्धन यांचे “वनस्पती आणि पक्षी-सस्तनप्राणी यांच्यातील संबंध” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण व्याख्यान झाले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे १२ पिडीत कामगारांची सुटका – सविस्तर बातमी
इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत झालेल्या या सत्राला पर्यावरणप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. डॉ. पटवर्धन यांनी नैसर्गिक अधिवासात पक्षी आणि सस्तन प्राण्यांची भूमिका, त्यांचे परस्परसंबंध, सहजीवन, अन्नसाखळीतील सहभाग आणि निसर्गसंतुलनात त्यांचे महत्त्व याविषयी सोप्या भाषेत पण शास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल मांडणी केली.
वनस्पतींच्या परागीभवनात आणि बीजप्रसारात पक्षी व सस्तन प्राणी कसे सहभागी होतात, जंगलातील परिसंस्थेत त्यांचे योगदान कसे आहे, आणि मानवाने या जैविक संबंधांकडे पाहण्याची गरज काय आहे – यावर त्यांनी ठोस उदाहरणांसह विचार मांडले. व्याख्यानानंतर उपस्थित प्रेक्षकांशी संवादही साधण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत अनेकांनी प्रश्न विचारून चर्चेला अधिक समृद्ध केले. या व्याख्यानमालेतील अंतिम सत्र उद्या शुक्रवार, दिनांक १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून, “वनस्पतींचा रासायनिक संवाद” या विषयावर डॉ. सागर पंडित यांच्याशी प्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ डॉ. महेश शिंदीकर संवाद साधणार आहेत.
हिरवाई महोत्सवाचा उद्देश म्हणजे स्थानिक देशी वनस्पतींबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या संवर्धनात जनसहभाग वाढवणे हा असून, या जैव सहजीवनावर आधारित संवादमालिका नागरिकांमध्ये निसर्गाविषयी गहन आकलन निर्माण करत आहे. कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून पर्यावरणप्रेमींनी उद्याच्या समारोप सत्रालाही उपस्थित राहावे, असे आवाहन ‘जीविधा’ संस्थेचे प्रतिनिधी राजीव पंडित व वृंदा पंडित यांनी केले आहे.




















