पुणे-मुंबईतील वाढत्या रेव्ह पार्ट्यांवर कठोर कारवाईची मागणी; ड्रग्ज पुरवठा साखळी उघड करण्यावर भर
marathinews24.com
मुंबई – पुणे, मुंबई आणि परिसरात वाढत चाललेल्या बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अंमली पदार्थांची विक्री आणि अशा पार्ट्यांमधील मृत्यूंच्या घटनांबाबत शिवसेना नेत्या व माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना निवेदन देत, रेव्ह पार्टी प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी व मुख्य सूत्रधारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.
पुणे पोलिसांनी तुळापूर येथील एका आलिशान फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाच्या हाय-प्रोफाइल पार्टीचा पर्दाफाश झाला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स आणि गांजा जप्त करण्यात आला. या पार्टीत १५६ तरुण-तरुणी उपस्थित असल्याचे समोर आले असून, त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि उच्चशिक्षित व्यावसायिकांचा समावेश असल्याचेही उघड झाले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून गुप्तपणे आयोजित केल्या जाणाऱ्या अशा पार्ट्या आता शहरांमधून ग्रामीण भागातील फार्महाऊस, रिसॉर्ट्स आणि खाजगी व्हिलांकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे, लोणावळा, मुळशी, कर्जत आणि वाघोली परिसरात विशेष तपास मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.
मुंबईतील काही पार्ट्यांमध्ये झालेल्या मृत्यूंच्या घटनांचाही संदर्भ देत डॉ. गोऱ्हे यांनी मद्य आणि अंमली पदार्थांच्या संभाव्य मिश्रणाची ‘एसआयटी’ स्थापन करून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. मद्य अधिकृतरीत्या पुरविण्यात आले असल्याचा दावा होत असला तरी तरुणांच्या मृत्यू किंवा प्रकृती बिघडण्यास नेमके कोणते घटक कारणीभूत ठरले, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत पोलिसांनी तातडीने एफआयआर नोंदवून मुख्य सूत्रधार, ड्रग पेडलर्स आणि आयोजकांपर्यंत पोहोचावे. तसेच अंमली पदार्थांचा व्यापार हा संघटित गुन्ह्याचा भाग असल्याने एनडीपीएस कायद्यांतर्गत कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी या संदर्भात सात प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये भक्कम दोषारोपपत्र दाखल करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे, मुंबईतील पार्टी मृत्यू प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमणे, मुख्य आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणे, सर्व सहभागींची निष्पक्ष चौकशी करून ड्रग्ज पुरवठा साखळी उघड करणे, ग्रामीण भागातील रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसचे विशेष ऑडिट करणे, सोशल मीडियावरील संशयास्पद नेटवर्कवर सायबर पाळत वाढविणे आणि बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही करणे यांचा समावेश आहे.
पूर्वीच्या अशाच प्रकरणांमधील दोषसिद्धीचा आढावा घेऊन तपास प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यात याव्यात आणि युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी राज्यव्यापी पातळीवर विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.






















