सरकार, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, प्रसार माध्यमे यांनी एकत्रित लढा उभारला पाहिजे – प्रा.डॉ. मिलिंद भोई
marathinews24.com
पुणे – अमली पदार्थांची तस्करीतून मिळणारा पैसा हा देश विरोधी, विघातक आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात आहे. यामध्ये अनेक अतिरेकी संघटनांचे जाळे कार्यरत आहे. प्रत्यक्ष युद्ध न करता अमली पदार्थांच्या माध्यमातून आपल्या देशातील तरुण पिढीवर हल्ला करण्याचे काम गेले अनेक वर्षे सुरू असून आता हे संकट आपल्या घरापर्यंत आले आहे. पूर्वी अमली पदार्थांची सवय ही इयत्ता आठवी पासून मुलांमध्ये सुरू होत होती पण दुर्दैवाने आता या पदार्थांनी पाचवी सहावीच्या मुलांना सुद्धा आपले लक्ष्य केले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे.
कारगिल विजय दिनी ‘कर्मयोध्दे’चे प्रकाशन – सविस्तर बातमी
दारू, तंबाखू गुटखा ,सिगरेट, हुक्का ही व्यसने प्रयत्नपूर्वक सोडवता येतात पण अमली पदार्थांचे व्यसन सोडवणे अतिशय कष्टदायक, खर्चिक आहे. यामध्ये व्यसन करणारे व्यक्तीबरोबरच त्याचे पूर्ण कुटुंब देशोधडीला लागते. त्यामुळे या समस्येवर लढण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, प्रसार माध्यमे यांनी एकत्रित लढा उभारला पाहिजे असे प्रतिपादन अमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समुपदेशक , महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे सन्माननीय सदस्य भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ. मिलिंद भोई यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे आणि इंद्रायणी विद्यालय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ आणि तरुणाई विषयावर आयोजित व्याख्यानसत्रात प्रा.भोई बोलत होते. अमली पदार्थ विरोधी कायद्यामध्ये नुकताच महाराष्ट्र सरकारने हे गुन्हे मोक्का कायद्यांतर्गत आणण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे, ही अतिशय स्तुत्य बाब आहे. याप्रसंगी इंद्रायणी शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष परदेशी , इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,रोटरी क्लबचे बसप्पा भंडारी, सौरभ मेहता, कविता खोल्लम, रितेश फाकटकर, डॉ सचिन भसे, राज्य पुरातत्व खात्याचे अधिकारी हेमंत गोसावी, डॉ यशवंत वाघमारे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मावळ भूषण कै. कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजक रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडेचे नवनिर्वाचित अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष परदेशी यांनी कार्यक्रमाचे आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना तरुणाईला पडत असलेला अमली पदार्थांचा विळखा ही आपल्या देशाच्या दृष्टीने गंभीर समस्या असून या विरोधात लढण्यासाठी रोटरी क्लब सारख्या संस्था या विषयावर व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे कार्य करीत आहेत. याला समाजाच्या सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे ही अतिशय चांगली बाब आहे असे सांगितले.
इंद्रायणी शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी बोलताना अशा प्रकारच्या उपक्रमांना आमची संस्था नेहमीच प्रतिसाद देईल असे प्रतिपादन केले. व्याख्यानानंतर अनेक विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ. मिलिंद भोई यांच्यासोबत या अमली पदार्थ व्यसनाविषयी दिलखुलास संवाद साधला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी उपक्रमात सहकारी राहण्याविषयी शपथ घेतली.
कार्यक्रमाचे आयोजनात रोटरी क्लबचे दिनेश चिखले, राकेश गरुड ,दिलीप पंडित, सुरेश गोपाळे , दिशा दोरुगडे, प्रमोद परदेशी, प्रभाकर वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख विजय गोपाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप टेकवडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत ताये यांनी केले.





















