अधिकार्यांची ठेकेदारांशी मिलीभगत – डॉ. बाबा कांबळे
marathinews24.com
पुणे – राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे साफसफाई कामगार महिलांनी तक्रार दाखल केल्यामुळे त्यांना बदली आणि नोकरी गमावण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत कष्टकरी कामगार पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ठेकेदार आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची मिलीभगत यामुळे कामगार महिलांवर अन्याय होत आहे.
वानवडीत महिला पोलीस उपनिरीक्षकाला घेतला चावा – सविस्तर बातमी
दिनांक 22 सप्टेंबरला डॉ. बाबा कांबळे, कष्टकरी कामगार पंचायतीच्या सरचिटणीस मधुरा डांगे आणि शिष्टमंडळाने बिझी नगर येथील आरोग्य कार्यालयात आरोग्य अधिकारी साळवे मॅडम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ठेकेदाराने कामगार महिलांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. मात्र, साळवे मॅडम यांनी ठेकेदारांना योग्य ठरवत, महिलांनी आयोगाकडे तक्रार करणे चुकीचे असल्याचे सांगितले आणि यामुळे अधिकाऱ्यांना त्रास झाल्याचे नमूद केले. यानंतर शिष्टमंडळाने क्षेत्रीय आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनवर झालेल्या चर्चेत वाघमारे यांनीही ठेकेदारांची बाजू घेत, महिलांनी आयोगाकडे तक्रार करणे अयोग्य होते, असे मत व्यक्त केले.
डॉ. बाबा कांबळे यांनी याबाबत संताप व्यक्त करत म्हटले, “महाराष्ट्र राज्य सरकारने मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या आयोगाकडे तक्रार करणे हा कामगारांचा कायदेशीर हक्क आहे. तरीही तक्रार केल्यामुळे महिलांची बदली करणे आणि त्यांना धमकावणे हे अत्यंत निंदनीय आहे. इंग्रजांच्या काळातही कामगारांना अशी वाईट वागणूक मिळत नव्हती. आज गोरे गेले आणि काळे आले, पण कामगारांवरील अत्याचार थांबले नाहीत. कामगार महिलांनी आयोगासमोर तक्रार करताना ठेकेदार उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत तक्रार केल्याने संतप्त झालेल्या ठेकेदाराने सुपरवायझर आकाश याच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशीच महिलांची बदली केली आणि पुन्हा तक्रार केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी दिली.
डॉ. बाबा कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला की, “मागासवर्गीय कल्याण समितीकडे तक्रार करणे हा गुन्हा आहे का? या प्रकरणात महिलांची पिळवणूक आणि सामाजिक शोषण होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.” त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.























