धायरीतील सराफी पेढीच्या मालकाविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – गुंतवणुकीच्या आमिषाने धायरीतील एका सराफी पेढीच्या मालकाने सुवर्ण भिशी योजनेत ३६ जणांची ४२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच २१ तोळे सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी सराफी पेढीच्या मालकासह त्याच्या पत्नीविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे.
सुशील हगवणे याला कोथरूड पोलिसांनी घेतले ताब्यात – सविस्तर बातमी
याप्रकरणी श्री ज्वेलर्स सराफी पेढीचे मालक विष्णू सदाशिव दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरीत दहिवाळ याची श्री ज्वेलर्स सराफी पेढी असून, दहिवाळने सुवर्ण भिशी योजना जाहीर केली होती. तक्रारदार आणि त्याच्या पत्नीने सुवर्ण भिशी योजनेत १ लाख ३० हजार रुपये गुंतविले होते. तक्रारदाराने १८ ग्रॅम वजनाचे गंठण मोडून आलेले १ लाख ९ हजार रुपये, तसेच आणखी १ लाख रुपये ऑनलाइन आणि रोख स्वरुपात दहिवाळ याच्याकडे दिले होते. चार तोळ्यांचे गंठण घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे एकूण मिळून ३ लाख ३९ हजार रुपये जमा केले होते. २५ मे रोजी तक्रारदार सराफी पेढीत गेले. तेव्हा सराफी पेढी बंद असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराने चाैकशी केली. तेव्हा दहिवाळ दाम्पत्य पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
चौकशीत तक्रारदारासह ३६ जणांनी दहिवाळ याच्या सुवर्ण भिशी योजनेत पैसे गुंतविले होते. दहिवाळ दाम्पत्याने एकूण मिळून ४२ लाख ७८ हजार रुपये, तसेच २१ तोळे सोन्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून पसार झालेल्या दहिवाळ दाम्पत्याचा शोध घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.