आरोपीच्या मुलावर पिस्तूलातून झाडल्या ३ गोळ्या
marathinews24.com
पुणे – शहरात गॅंगवाराचा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला टोळीने खून करूनच घेतला आहे. आंदेकर खुनातील आरोपीच्या मुलावर टोळीने पिस्तुलातून गोळ्यांचा वर्षाव केला. त्यातील तीन गोळ्या लागून तरुणाचा मुरू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास नाना पेठेत घडली आहे. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौज फाटा तैनात केला आहे. दरम्यान, गणेश उत्सवाची धामधूम सुरू असतानाच टोळीने खून केल्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांचे अपयश चव्हाट्यावर आले आहे.
पिस्तुले बाळगणार्या सराईताला बेड्या, वारजे पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी
आयुश गणेश कोमकर (वय २०, रा. नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान गणेश कोमकर हा एक वर्षापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आहे. तो वनराजच्या बहिणीचा दिर असून, आता टोळीने थेट वनराजच्या चुलत भाच्याचा खून केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठ परिसरात राहत असलेला आयुश कोमकर शुक्रवारी रात्री साडे सात वाजता दुचाकीवरून घरी आला होता. पार्किंगमध्ये दुचाकी उभी करत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आयुशच्या दिशेने गोळीबार केला. ११ राऊंड फायर करत हल्लेखोर पसार झाले. त्यातील ३ गोळ्या आयुशच्या शरीरात घुसल्या. त्यामुळे तो गंभीरपणे जखमी झाला. नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, आंदेकर खुनातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुश कोमकर याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी आयुशवर सलग गोळ्या झाडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्ला झालेल्या ठिकाणी पोलिसांचा ताफा दाखल झाला असून, तपास सुरू केला जात आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
टपका रे टपका गाणे सुरू असतानाच झाडल्या गोळ्या
गणेशोत्सव विसर्जनाची तयारी जोरात सुरू आहे . नाना पेठेतील एका मंडपात टपका रे टपका हे गाणे सुरू असतानाच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आयुश कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळ्याचा वर्षाव केला.. त्याच्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
म्हणून वनराज आंदेकरचा केला होता खून
कौटुंबिक वाद, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून १ सप्टेंबर २०२४ रोजी टोळीने नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, कोयत्याने वार करुन वनराज आंदेकर याचा खून केला होता. आंदेकरची बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी वाद झाले होते. कौटुंबिक वादातून खून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषआरोपात नमूद केले होते.
वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरून दुकानावर महापालिका अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला. त्यानंतर आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाड याची मदत त्यांनी घेतली . दरम्यान, गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने नाना पेठेत खून केला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाड आणि साथीदारांनी आंदेकरांचा खुनाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले होते.





















