कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची प्राथमिक माहिती
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रावणगाव परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. दसऱ्याच्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रावणगाव परिसरात शोककळा पसरली. जयश्री अशोक गावडे (वय ४५, रा. रानमळा वस्ती, रावणगाव, ता दौंड, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. जयश्री यांचा खून केल्यानंतर पती अशोक मारुती गावडे (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे दोन मुले आहेत.
पुण्यातील तडीपार गुंडासह चौघे गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावडे दाम्पत्य शांत, सुस्वभावी होते. गावात सर्वांशी ते मिळून मिसळून वागायचे. गावडे कुटुंबीयांची रावणगावात शेती होती. बुधवारी (१ ऑगस्ट) रात्री गावडे दाम्पत्यात वाद झाला. त्यानंतर पती अशोक यांनी पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर अशोक यांनी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची शक्यता आहे. गावडे दाम्पत्याला दोन मुले आहेत. एक मुलगा खासगी नोकरी करतो. दुसराा मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.






















