२६ जुलैला सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन
marathinews24.com
पुणे – कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून भारत मातेच्या रक्षणार्थ कारगिल युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच या युध्दामध्ये दिव्यांगत्व आलेल्या सैनिकांचा आणि शौर्य पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात येणार आहे. सैनिक कल्याण विभाग येथे आयोजित शनिवार, २६ जुलैला सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सैनिक कल्याण विभाग, पुणे आणि महाराष्ट्र कायदेशीर सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “नालासा वीर परिवार सहाय्यता योजना २०२५” ही नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे.
जागतिक नेतृत्व करण्यासाठी बॅटरीत नवीन तंत्रज्ञानाचे व्यावसायिकरण महत्त्वाचे ठरणार – सविस्तर बातमी
याअंतर्गत माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत व सक्षम कायदेशीर मदतीकरीता विधी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील अधिकाधिक वीरपत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक, आणि माजी सैनिकांचे अवलंबितांना उपस्थित रहावे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे सतेश देवानराव (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
नवीन उद्योगाकरिता संपर्क साधण्याचे आवाहन
मैत्री सेल उद्योग विभागाअंतर्गत नवीन उद्योग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता 18002332033 टोल फ्री क्रमांकावर मार्गदर्शन करण्यात येणार असून अधिकाधिक उद्योजकांनी उद्योगासंदर्भात या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी केले आहे.
टोलफ्री क्रमाकांसोबतच कार्यालयीन 022-22622322, 22622361 दुरध्वनी क्रमांकवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. यामध्ये नवउद्योजकांना उद्योग सुरु करण्याकरिता लागणाऱ्या अनुज्ञाप्ती, परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती, उद्योगधंद्यासंदर्भात शासनाशी निगडित येणाऱ्या अडीअडचणी व त्यावर उपायायोजना, विविध उत्पादनांचे विदेशामध्ये निर्यात करणे, निर्यातीकरिता शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही कोठारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.























