बहिणीसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून टोळक्याचा हल्ला
marathinews24.com
पुणे – बहिणीशी वाद झाल्याच्या कारणावरून टोळक्याने एका अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून केल्याची घटना कात्रज भागात घडली. गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत गणेश रामदास चव्हाण (वय २२, रा. गुजर वस्ती, कात्रज) याने फिर्याद दिली आहे.
‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाई – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण आणि गणेश माळवे हे मित्र आहेत. तीन महिन्यांपूर्वी माळवे याचा आरोपीच्या बहिणीशी वाद झाला होता. वादातून एका आराेपीने गणेशला जिवे मारण्याची धमकी दिली. गणेश याने कात्रज कट्टा परिसरात असलेल्या एका दुकानात मोबाइल दुरुस्तीसाठी दिला होता. सोमवारी (२० जुलै) रात्री दहाच्या सुमारास माळवे आणि चव्हाण हे मोबाइल दुकानात निघाले होते. दुरुस्त केलेला मोबाइल त्याने दुकानातून घेतला. त्या वेळी दुचाकीवरून आरोपी तेथे आले. आरोपींकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींना पाहताच माळवे हा तेथून पळाला. आरोपींनी पाठलाग करून माळवे याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात माळवे पडला. त्यानंतर या घटनेची माहिती त्याचा मित्र चव्हाण याने माळवेच्या भावाला दिली.
माळवेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करत आहेत.






















