हडपसरमधील घटना उघडकीस, वर्षभरानंतर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पार्टी करताना झालेल्या वादातून दोघांनी मित्राला वाहत्या पाण्यात ढकलून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या वर्षी हडपसर भागात ही घटना घडली असून, याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास करुन दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
जेईई’चे वर्ग बंद करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक – सविस्तर बातमी
विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. वैभव मनोज जाधव (वय ४२, छत्रपती संभाजीनगर) आणि अशिष यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार (वय ३६) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी माहितीनुसार, विनोद, वैभव आणि अशिष हे हडपसर भागातील उन्नतीनगर परिसरातील कालव्याजवळ ४ मे २०२४ रोजी पार्टी करण्यासाठी गेले होते. तिघांनी तेथे दारु प्यायल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यामुळे आरोपी वैभव आणि आशिष त्यांनी विनोदला वाहत्या पाण्यात टाकून दिले. पाण्यात बुडून विनोदचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.
विनोद यांच्या पत्नीने पतीचा खून झाल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोघांची चौकशी केली. वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबतचा अहवाल पोलिसांकडे सादर केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.