आंदोलनाला शिवप्रहार संघटनेचा पाठिंबा
marathinews24.com
पुणे – मराठा समाजासाठी सुरु असलेला न्याय हक्काचा लढा हा कायदा व संविधानाच्या चौकटीतून आहे. संबंधित लढ्याला शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्याने मराठा संघर्षाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला ठाम पाठिंबा दिला आहे. २९ ऑगस्टपासून मुंबईत “बेमुदत अमरण उपोषण” सुरू करून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढा पुन्हा पेटवला आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोथरुडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी – सविस्तर बातमी
मराठा समाज जो कुणबी आहे, या ओळखीची नोंद कायद्याच्या चौकटीत करून न्याय मिळवणे हीच समाजाची मागणी आहे. ती कुणाच्या विरोधात नाही, तर न्याय व घटनात्मक हक्काची मागणी आहे, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. मराठा समाजाची सद्यस्थिती जर पहिली तर राज्यभरातील मराठा समाजाला शिक्षण, नोकरी आणि प्रगतीच्या संधी मिळाव्यात यासाठी आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजात अन्यायाची भावना वाढीस लागली आहे. समाजाच्या पिढ्यान्पिढ्या मागे राहिलेल्या प्रश्नांना न्याय मिळवण्यासाठी आता सर्वांनी एकदिलाने पुढे येण्याची वेळ आल्याचे शिवप्रहार संघटनेने म्हटले आहे.
संघटनेचे प्रदेश संघटक महेश टेळे पाटील म्हणाले, मराठा समाजाचा लढा कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने आहे. समाजाच्या मागण्या कुणाच्याही विरोधात नसून घटनात्मक मार्गाने त्यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. या लढ्याला शिवप्रहार संघटनेचा भक्कम पाठिंबा राहील. शिवप्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहणे, जनजागृती करणे, तसेच सोशल मीडियाद्वारे आवाज उठवणे हेही आंदोलनाला बळकटी देणारे ठरेल, असे टेळे पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाचा हा लढा भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी आहे. त्यामुळे आज समाज एकत्र उभा राहिला नाही तर उद्या इतिहास माफ करणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.





















