माहेरच्यांकडून हुंडाबळीचा आरोप
marathinews24.com
पिंपरी – सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड येथे सोमवारी (दि. १८) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान, हा हुंडाबळीचा प्रकार असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे.
अखेर तीन मजुरांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
दिव्या हर्षल सूर्यवंशी (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दिव्याचा भाऊ देवेंद्र भाऊसाहेब खैरनार (वय २६, रा. मोहाडी, प्र. डांगरी, ता. जि. धुळे) यांनी मंगळवारी (दि. १९) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०२२ मध्ये दिव्याच्या माहेरच्यांनी ४० तोळे सोने आणि सुमारे २० लाख रुपये खर्च करून थाटामाटात दिव्याचे लग्न करून दिले. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी दिव्याचा छळ सुरू केला. तिला नोकरी न मिळणे, फर्निचरसाठी पैसे न आणणे आणि मुलबाळ न होणे यावरून सातत्याने अपमानित केले जात होते.
तिला घरकामाचा अतिरिक्त ताण, मारहाण आणि मानसिक त्रास दिला गेल्याचा माहेरचा आरोप आहे. दिव्याचा भाऊ देवेंद्र यांनी रक्षाबंधनासाठी पुण्याला येणार असल्याचे फोन करून सांगितले. त्या कारणावरून सासरच्यांनी वाद घालत दिव्याला मारहाण केली. देवेंद्र यांचे वडील दिव्याच्या नणंदेकडे समजावण्यासाठी गेले. परंतु, त्यांनी दिव्यालाच दोष दिला.
माहेरच्यांकडून घातपाताचा संशय
दिव्याच्या शरीरावर मारहाणीच्या ताज्या खुणा आढळल्याने तिच्या माहेरच्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सासरच्या मंडळींनी छळ करून दिव्याला आत्महत्येस प्रवृत्त केले असून, हा हुंडाबळीचा प्रकार आहे, असा आरोप माहेरच्यांनी केला आहे.





















