नेमका कुठे अडखळला पाऊस?
marathinews24.com
पुणे : (रेवण कोळेकर) – उकाड्यामुळे हैरान झालेले नागरिक सध्या आकाशाला डोळे लावून बसले आहेत. परंतु मान्सूनची अद्याप सुरुवात झालेली नाही. झाले आहेत. काही दिवसांपूर्वी हवामान विभागाकडून येत्या १५ ते १६ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रभर व्यापेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र मान्सून मध्येच रेंगाळल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यात अतिरिक्त वेळ लागणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. जवळपास अर्धा जून महिना पूर्ण झाला तरीही महाराष्ट्रात मान्सूनची चिन्ह दिसत नसल्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
असहिष्णू वातावरणात विनोद फुलू शकत नाही- प्रा मिलिंद जोशी – सविस्तर बातमी
पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय झाला असून याचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागे एल निनोचा प्रभाव असल्याचं कारण सांगितलं जात आहे.
मान्सून संपूर्ण महाराष्ट्रत कधी दाखल होणार?
मान्सूनचा प्रगती पाहिली तर आतापर्यंत मान्सून तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पोहोचला आहे. सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात येणारा पाऊस पूर्व मोसमी पाऊस आहे. अद्याप मान्सून पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे. पुढील ४ ते ५ दिवसातही मान्सून पुण्यात धडकण्याची शक्यता अजूनही कमीच आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पावसाचे संकेत कमी आहेत. यावर्षीही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे जून ते सप्टेंबर या पावसाच्या कालावधीत अल निनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पुढील काही दिवस पावसाची शक्यता नसल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या वातावरणीय परिस्थिती अनुकूल नाही. पूर्वमोसमी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता असून राज्यात मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी आणखी प्रतीक्षाचं करावी लागणार असल्याचं पुणे वेधशाळेतून हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
सध्या जूनचा अर्धा महिना संपला तरी मान्सून अद्याप संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्व मोसमी पावसावरती अवलंबून पेरणी करू नये असा सल्ला शासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकरी संकटात सापडलेला आहे.
























