२६ ते २८ सप्टेंबर कालावधीत पावसाचा जोर वाढणार
marathinews24.com
पुणे – बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव २८ तारखेपर्यंत महाराष्ट्रात जाणवणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने राज्यातील विविध भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. दि. २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ वातावरण आणि हवामानामुळे पावसात वाढ होणार आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
राज्यात २२ ते २५ सप्टेंबर कालावधीत मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, २६ सप्टेंबरपासून या प्रणालीचा प्रभाव स्पष्ट जाणवणार असून, विदर्भ व मराठवाड्यातील पूर्व-दक्षिण भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल. २७ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर २८ सप्टेंबर रोजी राज्याच्या पश्चिम भागांत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.
मान्सूनचा निरोप किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी पुढे ढकलला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, या हवामानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.























