देशाच्या नवनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या शिल्पकराचा हा सन्मान-एकनाथ शिंदे
marathinews24.com
पुणे – देशाच्या नवनिर्मितीचे शिल्पकार नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित – महाराष्ट्रातल्या मराठी मातीतले सच्चे आणि दिलदार नेते असलेल्या नितीन गडकरी यांचा प्रत्येकाला अभिमान असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडकरींच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी याच पुण्यनगरीतून स्वराज्याचा मंत्र भारतीय जनतेला दिला. ब्रिटीशांनी त्यांना ‘भारतीय असंतोषचे जनक’ तर महात्मा गांधींनी ‘आधुनिक भारताचे जनक’ म्हटले. अशा महान व्यक्तिमत्वाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार गडकरींना मिळणे, ही अभिमानास्पद बाब आहे.
युती सरकारच्या काळात गडकरींनी मुंबईत बांधलेल्या ५५ उड्डाणपुलांमुळे मुंबईत आज वाहतूकीची समस्या कमी करण्यासाठी मोलाची मदत होत आहे. मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग, अनेक पोर्टची उभारणी, महामार्गचे जाळे निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. ते रस्ते विकासाचे महामेरू आहेत. भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी गडकरींचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. राज्यात मोठे निर्माण कार्य करतांना त्यांचा आदर्श राज्यातील नेतृत्वासमोर असतो. ते आदर्श नेता, आदर्श मंत्री आणि आदर्श मित्र आहेत. आर्थिक आणि रचनात्मक शिस्त पाळून त्यांनी आपल्या कार्यातून लौकीक निर्माण केला आहे. जात, पंथ, भाषा विरहीत विचार असलेले आणि माणूस गुणांमुळे मोठा होता हे तत्वज्ञान त्यांनी कार्यातून मांडले. त्यांचे कार्य विकासनिती आणि विकासकामे ‘लोकमान्य’ झाल्याने त्यांना लोकमान्य टिळकांच्या नावाने मिळालेला पुरस्कार अधिक समर्पक ठरतो, असे त्यांनी सांगितले.

विकासनिष्ठ, विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सन्मान – अजित पवार
लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री श्री.गडकरी यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, लोकमान्य टिळक परखड विचारांची ठाम भूमिका घेणारे आणि राष्ट्रसेवेची अखंड तळमळ असणारे असामान्य नेते होते. त्यांच्याच विचारावर चालणाऱ्या गडकरी यांची पुरस्कारासाठी झालेली निवड अत्यंत योग्य आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या गडकरींनी पुरस्कार मिळणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.नितीन गडकरी हे केवळ यशस्वी राजकारणी नसून प्रयोगशील शेतकरी आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक आहेत. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि विकासाची दृष्टी असलेले नेते आहेत.
गडकरी हे विकासाच्या विषयावर सतत चिंतन करणारे नेते असून आणि नवी माहिती एकत्रित करण्याचा ध्यास असतो. प्रत्येक निर्णय घेतांना त्यांचा विचार स्पष्ट असतो आणि निर्णयातही धडाडी दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यांनी पक्षीय राजकारणापुढे जावून समाजकारणाकडे लक्ष केंद्रीत केले. त्यांचे कार्य इतरांसाठी मार्गदर्शक आहे. बोलण्यातल्या स्पष्टपणासोबत स्वभावातील संवेदनशीलताही त्यांनी जपली आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास धरून त्यांनी अनेक महत्वाचे मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसीत केले आहेत. महाराष्ट्राच्या किर्तीचा सुगंध ते देशात पसरवीत आहेत. स्वभावातील विनय आणि सहकार्याचा धागा जपून वाटचाल करणाऱ्या विकासनिष्ठ, विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा हा सन्मान आहे, असे पवार म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित टिळक यांनी केले.ते म्हणाले, १९८३ मध्ये कै.जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना देण्यात आला होता. भारताला प्रगतीशील राष्ट्र करण्यासाठी आणि जगभरात देशाचा लौकीक वाढविणाऱ्या व्यक्तिंचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. देशभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात आला आहे. यावर्षी आपल्या कार्याने रस्त्यांच्या माध्यमातून देशाला जोडण्याचे कार्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ट्रस्टने एकमताने निवड केली आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी स्वर्गीय दिपक टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित व्यक्तिंच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला आमदार विजय शिवतारे, भीमराव तापकीर, विश्वजीत कदम, बापूसाहेब पठारे तसेच हर्षवर्धन पाटील, प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते.





















