लोकविद्यापीठ लोकार्पण सोहळा संपन्न
marathinews24.com
पुणे – समाजातील अंधश्रद्ध दूर करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. मात्र, व्यक्तिगत अडचणीमुळे लोक अंधश्रद्धा नादी लागत आहेत. हे दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने लोकविद्यापीठाच्या माध्यमातून अंगात येणे, भूत पिशाच्या असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे भविष्यात या लोक विद्यापीठाचे महत्त्व असणार आहे, असे प्रतिपादन प्रा. सुहास पळशीकर यांनी केले आहे.
वाहतुकीचा नव्हे अपघातांचा नवले पूल – सविस्तर बातमी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ लोकार्पण सोहळा पत्रकार भवनात पार पडला. यावेळी पळशीकर बोलत होते. कार्यक्रमावेळी डॉ दाभोलकर लिखित १० पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, जेष्ठ प्राध्यापक व अभ्यासक सुहास पळशीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, राही ढाके, उपस्थित होते.
प्रा. पळशीकर म्हणाले, समाजात विवेक जागृतीचे काम झाले पाहिजे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची चर्चा जास्त चिकित्सक करावी लागेल.लोकविद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंधश्रद्ध निर्मूलनाचे महत्व समजावून पटवून द्यावे लागणार आहे. तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक एकमेकांसोबत चर्चा करतील त्याद्वारे माहिती अदान प्रदान केली जाईल. यासाठीही काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हमीद दाभोलकर म्हणाले, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा वाढत असून, नुकतीच कोथरुडमध्ये एका दांपत्याला भोंदू बाबाने १४ कोटींचा गंडा घातला आहे. जे ज्ञान उपलब्ध आहे, ते अर्जित करून घेतले पाहिजे. आज अंधश्रद्धा फक्त हिंदुस्थानात नसून, संपूर्ण जगभरात पसरली आहे. त्यामुळे अंधश्रद्धा कमी करण्यासाठी आपल्याला आणखी काम करावे लागणार आहे. त्यासाठी दिवंगत डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी लिहलेल्या १० पुस्तकांचे इंग्रजी भाषांतर केले आहे. त्यामुळे परदेशातही लोकांना अंधश्रद्धेबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
मुक्ता दाभोळकर म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विचार रुजवण्यासाठी आपल्याला लोकांमध्ये जावे लागेल. राज्यात ठिकठिकाणी आम्हाला अनेकजण डॉक्टरांचे भाषण ऐकलेले भेटत आहेत. विवेकवादी समाजची निर्मिती करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, विज्ञानाचा वसा घेतलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे लोकविद्यापीठ लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी झोकून काम पाहिले आहे. हे काम आणखी पुढे नेण्यासाठी प्रयत्न गरजेचा असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.




















