डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे गौरवोद्गार
marathinews24.com
पुणे – विज्ञान आणि संगीत दोन्ही गोष्टी सत्याचा शोध घेणाऱ्या आहेत. विज्ञान ब्रह्मांडातील स्पंदने समजावते तर संगीत त्या स्पदनांना भावनेचा अर्थ देते. विज्ञानात कंपनाने ऊर्जा निर्माण होते तर संगीतामध्ये त्या कंपनांनी आनंद निर्माण होतो. शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टी आपल्याला शांततेच्या सुरात नेऊन ठेवतात. पुल स्मृती सन्मान सोहळ्यात पंडित अजय चक्रवर्ती यांचे सूर आणि पु. ल. देशपांडे यांच्या शब्दांनी भाव आणि बुद्धी, रस आणि तर्क, गाणे आणि ज्ञान या साऱ्यांचा सुंदर संगम घडविला आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.
भारतीयांचे बुद्धिवैभव देशासाठी अधिक वापरले जावे – सविस्तर बातमी
कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल पुलोत्सवात शनिवारी (दि. ८) पद्मभूषण पंडित अजय चक्रवर्ती यांचा डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पुल स्मृती सन्मान देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी माशेलकर बोलत होते. ग्लोबल पुलोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पु. ना. गाडगीळचे वरिष्ठ व्यवस्थापक सतीश कुबेर, महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव मंचावर होते. बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मान सोहळ्याने तीन दिवसीय ग्लोबल पुलोत्सवाचा समारोप झाला.
शब्दप्रभू पु. ल. देशपांडे हे शब्द, स्वर, विनोदाची नजाकत सांभाळत हसविणारे तेव्हाच विचार करायला लावणारे संवेदनशील साहित्यिक, गायक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, प्रवासी तसेच समाजसेवी व्यक्तीमत्व होते. या असामान्य सर्जकाला पुलोत्सवाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करणे ही आनंददायक घटना आहे, असे सांगून डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, या तीन दिवसीय सांस्कृतिक, कलात्मक, विचार भावनांच्या उत्सवातील मोलाचा क्षण म्हणजे पुल स्मृती सन्मानाने पंडित अजय चक्रवर्ती यांचा गौरव होणे. पंडित अजय चक्रवर्ती यांची गायकी अभ्यासपूर्ण, भावना व भक्तीने ओथंबलेली, आत्म्याला स्पर्श करणारी तसेच साधना, ध्यान, अध्यात्म यांची अनुभूती देणारी आहे. तर डॉ. रघुनाथ माशेलकर पुढे म्हणाले, पुलंना प्रत्यक्ष भेटलो तेव्हा माझी अवस्था देवासमोर एखाद्या पुजाऱ्याने बसावे अशी होती. शास्त्रज्ञ असलो तरी माझा असा ठाम विश्वास आहे की, देव जेव्हा फुरसतीने एखादी व्यक्ती घडवितो तेव्हा पुलंसारखे व्यक्तीत्व जन्मास येते. आजही मला निराशा आली तर मी पुलं वाचतो किंवा ऐकतो आणि ताणरहित होतो.
पुलं सन्मान माझ्यासाठी गुरूंचा आशीर्वाद..
सत्काराला उत्तर देताना पंडित अजय चक्रवर्ती म्हणाले, भारतीय शास्त्रीय संगीत हे जगातील सर्वोत्तम संगीत आहे. त्याला जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. मी स्वत:ला आजही संगीत क्षेत्रातील एक विद्यार्थीच समजत आहे. गेली 68 वर्षे मी संगीत शिकत आहे आणि पुढील पिढीपर्यंत ते प्रवाहित करण्याचा प्रयत्न करत आहे. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या वंदनीय अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या नावे मिळालेला हा सन्मान हे माझ्या दृष्टीने गुरूंचे आशीर्वादच आहेत. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सन्मान असून मी अत्यंत कृतज्ञतेने तो स्वीकारत आहे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, पुलोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक पुलंप्रेमी रसिकाला आनंद मिळाला आहे. तसेच वीरेंद्र चित्राव म्हणाले, पुलोत्सव हा केवळ एक उत्सव नसून नाममुद्रा उमटविणारा संस्कार आहे. पुलंच्या विचारांचा जागर, त्यांच्यातील विविध पैलूंचे प्रकटीकरण या महोत्सवाच्या माध्यमातून रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. पुलंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तरुणांसाठी पुलोत्सवाचे 12 जून रोजी आयोजन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मानपत्राचे वाचन संगीतकार, गायक शेखर सेन यांनी केले. मान्यवरांचे स्वागत सतीश जकातदार यांनी केले तर सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. उत्तरार्धात पंडित अजय चक्रवर्ती यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. त्यांच्याशी शेखर सेन यांनी संवाद साधला. अवघ्या अडिचाव्या वर्षापासून लाभलेले संगीत शिक्षण, त्यासाठी वडिलांचा खाल्लेला मार, पुढे अनेक गुरूंकडून मिळालेली तालीम, आईची शिकवण, संगीताचे झालेले संस्कार, गुरू महती, संगीताविषयीचे विचार आदी विषयांवर भाष्य करत त्यांनी सांगीतिक प्रवास उलगडला.























