संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीकडून २२ किलो कलश निर्मितीचा मान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगरकरांचा सन्मान
marathinews24.com
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण झाले. भाविकांच्या वर्गणीतून तयार केलेला हा अद्वितीय २२ किलोचा सुवर्ण कलश पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सने साकारला आहे. अपार श्रद्धा आणि उत्तम कामगिरीचा आशीर्वाद म्हणून आळंदी देवस्थान संस्थानाने नगरकर परिवाराला मिळाल्याची भावना आहे. कलशाचे विधिवत पूजन करून, नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर हा कलश नगरकर परिवाराने देवस्थान समितीकडे सुपूर्त केला.
स्वदेशी संशोधन आणि विकासावर भर देण्याची गरज-माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे – सविस्तर बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पाठारे, महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, यांच्यासह संत परंपरेतील मान्यवर व देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नगरकर ज्वेलर्सचे वसंत नगरकर, प्रसाद नगरकर व पुष्कर नगरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या संमतीने नगरकर ज्वेलर्सला हे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली. ८ ऑगस्टला कलश निर्मितीची सूचना आल्यानंतर वरचा कळस आणि खाली कुंभ असे दोन भागात काम सुरु झाले. चोख २२ किलो सोन्याच्या वापर करीत सलग सहा दिवस २२ ते २५ कारागिरांनी भक्तीभाव, निष्ठा व सर्जनशील कौशल्यातून हा कलश साकारला. हा सुवर्ण कलश केवळ वास्तूशोभा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेला दिलेला तेजोमय मुकुट आहे, अशी भावना वसंत नगरकर यांनी व्यक्त केली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त मंदिरावर प्रतिष्ठापित झालेला सुवर्णकलश बनविण्याचा क्षण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे. नगरकर ज्वेलर्ससाठी हा क्षण म्हणजे भक्तिभाव, समर्पण आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठीचा सुवर्ण वारसा आहे. नगरकर ज्वेलर्सना लाभलेला हा ऐतिहासिक मान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला समृद्ध करणारा ठरला, असे प्रसाद नगरकर म्हणाले.





















