तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता
marathinews24.com
पुणे – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नवी पेठेत घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. प्राथमिक चौकशीत तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सागर सुभाष पवार (वय २६, रा. मेहेकर, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
‘सागर मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील आहे. तो गेल्या तीन ते चार वर्षांपासून पुण्यात राहत असून, तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. नवी पेठेत तो मित्रांबरोबर राहत होता. शुक्रवारी दुपारी त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्याच्या मित्रांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. मित्रांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा सागरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले’, अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली.
‘आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. पाेलिसांनी त्याच्या मित्रांकडे चैाकशी केली. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केेल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, असे पोलीस निरीक्षक कसबे यांनी सांगितले.






















