ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
marathinews24.com
पुणे – ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विकासात्मक दृष्टी ठेवून काम केले तर ग्रामविकासाला मोठी चालना मिळेल. त्यासाठी हे प्रशिक्षण मैलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
मस्साजोग पोटनिवडणुकीत देशमुखांच्या पत्नीचा ९२ मतांनी पराभव – सविस्तर बातमी
राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान व राज्य ग्रामीण विकास संस्था (यशदा) यांच्या संयुक्त विद्यमाने यशदा, पुणे येथे नुकतीच राज्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांसाठी तीन दिवसीय पायाभूत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यशाळेच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर व पुणे जिल्ह्यातील एकूण ८५ जिल्हा परिषद सदस्य सहभागी झाले होते.
गोरे म्हणाले की, जिल्हा परिषदेमध्ये प्रभावीपणे काम करण्यासाठी सदस्यांना प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने यशदा येथे नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना विविध विषयांवरील सखोल मार्गदर्शन देण्यात आले. या प्रशिक्षणाचा उपयोग करून सदस्यांनी आपल्या मतदारसंघात सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत सक्षमीकरण अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद पुणे चे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी तसेच सत्र संचालक आनंद पुसावळे व शरदचंद्र माळी उपस्थित होते.























