मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा; डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कारांचे वितरण
marathinews24.com
पुणे – वारकरी संप्रदायाने आणि संतमांदियाळीने महाराष्ट्राची संस्कृती जपली. सर्व समाजगटांना सामावून घेतले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने लवकरच स्वतंत्रपणे तीन दिवसीय वारकरी संप्रदाय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे केली. या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर केला जाईल, असेही ते म्हणाले.
संत विचार प्रबोधिनी, पुणे आणि डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित वैकुंठवासी डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हभप केशव महाराज नामदास यांना डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनसेवा पुरस्कार तर भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांना डॉ. रामचंद्र देखणे स्मृती लोककला सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पूजा देखणे, अंजली देखणे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख डॉ. राजेंद्र उमाप, विश्वस्त हभप पुरुषोत्तम पाटील, हभप उमेश महाराज मोरे, सचिन ईटकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सभागृहात हा कार्यक्रम झाला.
उद्य सामंत म्हणाले, महाराष्ट्र संस्कृतीचे जतन वारकरी संप्रदायाने केले आहे. सर्व समाजघटकांना सामावून घेत, संतांनी आणि वारकरी परंपरेने मोठे योगदान दिले आहे. त्याचा सन्मान म्हणून राज्य शासनातर्फे स्वतंत्रपणे तीन दिवसांचे वारकरी साहित्य संमेलन आयोजित केले जाईल आणि समग्र वारकरी त्यात सहभागी व्हावे, असा प्रयत्न केला जाईल.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कठीण तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत मांडण्याचे कार्य कीर्तनकार आणि भारूडकारांनी केले आहे. समाजातले प्रश्न आणि अंधश्रद्धा मोडण्याचा प्रयत्न केला आहे. आज समाजात मिश्र संस्कृती दिसत आहे. त्यातूनही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या निराकरणासाठी आजही संतांचे विचार, भारूडे आणि कीर्तन उपयोगी आहेत. केशवमहाराज आणि चंदाताईंसारखी मंडळी त्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत. डॉ. रामचंद्र देखणे यांनी कीर्तन, प्रवचन, भारूड आणि व्याख्यानांच्या माध्यमातून लोकजागणाचे कार्य सातत्याने केले, याचाही उल्लेख पाटील यांनी केला.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, अतिशय योग्य व्यक्तींना हे पुरस्कार दिले गेल्याने औचित्य साधले गेले आहे. केशव महाराजांचे घराणे हे महाराष्ट्रातील आद्य वारकरी घराणे आहे. त्यांच्या वंशजांना तसेच भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणार्या चंदाताईंना हा पुरस्कार देणे, आनंदाचा भाग आहे. वारकरी संप्रदायाला संघटित आणि संस्थात्मक रूप देण्याचे कार्य नामदेवरायांनी केले. हसता हसता प्रबोधनाची परंपरा भारूडकार एकनाथांनी सुरू केली. त्यांनी आपली परंपरा, संस्कृती, मानवता आणि सदाचाराचे महत्त्व शेवटच्या स्तरापर्यंत नेले, हे अतिशय महत्त्वाचे आहे.
मनोगतात हभप नामदास महाराज म्हणाले, संतांचा प्रसाद म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही नामदेवरायांची परंपरा जपण्याचे कार्य फक्त मी करत आहे. नामदेवराय हे आद्य वारकरी, आद्य फडकरी होते. कीर्तनकार होते. कीर्तनकारांचे सच्चा, अच्छा, बच्चा, लुच्चा असे प्रकार असतात. आम्ही सच्चे कीर्तनकार व्हावे, असा प्रयत्न आहे. डॉ. रामचंद्र देखणे यांच्याशी स्नेहबंध होते. ते उत्तम भारूड व कीर्तन सादर करत असत. त्यांच्या स्मृतीचा हा पुरस्कार मी प्रसाद म्हणून स्वीकारतो.
चंदाताई तिवाडी यांनी मारवाडी समाजातील स्वतःची जडणघडण कथन केली. मी नक्कल करत शिकत गेले. हभप धुंडामहाराज यांचे कीर्तन ऐकून माझा कायापालट झाला आणि मी भारूडकार झाले. विशेषतः अणुरणिया थोकडा.. या अभंगाने माझ्यात बदल घडला. आकाशवाणीने मला उत्तम संधी दिली. मी सर्वांपर्यंत पोहोचू शकले. डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह मी थेट दिल्लीतही भारूड सादर केले. एचआयव्हीसारख्या आरोग्यसमस्येविषयी प्रबोधन करणारे सादरीकरण केले. भारूडाच्या कार्यशाळा घेतल्या. नवी पिढी तयार केली, याचे समाधान आहे.
प्रास्ताविकात डॉ. भावार्थ देखणे यांनी वडील डॉ. रामचंद्र देखणे यांच्या आठवणी जागवल्या. डॉ. देखणे स्वतः वारकरी तर होतेच, पण ते उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, भारूडकार आणि व्याख्याते होते. सर्व माध्यमांतून त्यांनी समाजात सातत्याने लोकजागरण आणि प्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठीच त्यांनी ज्या क्षेत्रांत कार्य केले, त्या त्या क्षेत्रांतील उत्तम कार्यरत व्यक्तीला पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी चंद्रकांत पाटील तसेच उदय सामंत यांच्या हस्ते माऊली टाकळकर, आनंद देशमुख आदींचे सत्कार करण्यात आले. प्रियांका ढेरंगे चौधरी यांनी गुरुस्तवन तसेच पसायदान सादर केले. डॉ. पूजा देखणे यांनी मानपत्रांचे वाचन केले. पद्मश्री जोशी यांनी आभार मानले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.





















