शपथविधी झाल्यानंतर मोठे तीन निर्णय
marathinews24.com
पुणे – आज सकाळी १० वाजता सुपरस्टार आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. निवडणुकीच्या निकालानंतर पाच दिवसांनी हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच सी. जोसेफ विजय यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या हेतूने महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केल्या.
व्यावसायिक विश्वात लिंगभेदातीत विचार व कृती करा – सविस्तर बातमी
मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच शपथविधीनंतरचे पहिले तीन धडाकेबाज निर्णय
२०० युनिट मोफत वीज : तमिळनाडूतील जनतेला मोठा दिलासा देत विजय यांनी राज्यातील प्रत्येक घरासाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याची घोषणा केली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
अमली पदार्थ विरोधी ‘स्पेशल टास्क फोर्स : राज्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि ड्रग्स तस्करीचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने एका विशेष कृती दलाची (Special Task Force) स्थापना करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. ‘ड्रग-फ्री तमिळनाडू’ हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
महिला सुरक्षेसाठी विशेष दलाची स्थापना : राज्यातील महिलांची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणखी एक स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी हे दल काम करेल.
निवडणूक प्रचारादरम्यान विजय यांनी जनतेला शब्द दिला होता की, मुख्यमंत्री होताच मी वेळ वाया न घालवता कामाला सुरुवात करेन. आज शपथविधीनंतर त्यांनी आपल्या भाषणात या तीन निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमुळे तमिळनाडूच्या राजकारणात आणि प्रशासनात ‘थलपती’ स्टाईलने एका नव्या युगाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. मोफत वीज आणि कडक सुरक्षा या दोन प्रमुख मुद्द्यांवर भर देऊन त्यांनी पहिल्याच दिवशी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.
























