जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी पुण्यनगरीत विसावला
marathinews24.com
पुणे – श्री क्षेत्र पंढपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. २०) संध्याकाळी पाचच्या सुमारास संचेती चौकात दाखल झाला . त्यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. हरीनामाचा गजर करीत लाखो वारकर्यांकडून पहाटे चार वाजल्यापासून स्नानसंध्या करून ग्यानबा तुकारामाच्या गजरात पुण्याकडे मार्गक्रमण केले होते. भाविकांकडून वारकर्यांची सेवा करण्यासाठी ठिकठिकाणी नियोजन केले होते. त्यासोबतच दोन्ही पालखी सोहळ्यात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन – पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या रथाची सजावट, फुलांचा सुगंध,अत्तराचा घमघमाट आणि ज्ञानोबा तुकरामाचा जयघोषात पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळीच आकुर्डीतून पुण्याकडे प्रस्थान केले होते. तत्पुर्वी १८ जूनला प्रस्थान झाल्यानंतर तुकोबांचा पालखी सोहळा १९ जूनला पिंपरी-िंचचवडमधील आकुर्डीत मुक्कामी होता. त्यामुळे दर्शनासाठी परिसरातील नागरिकांसह भाविकांनी गर्दी करीत मोठ्या भक्तीभावाने पालखीला निरोप दिला.
शुक्रवारी (दि. २० ) सकाळी सहापासूनच तुकाराम महाराजांच्या पालखीने पुण्याकडे मार्गक्रमण केले. संध्याकाळी चारच्या सुमारास पुण्याची हद्द असलेल्या बोपोडीत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भाविकांकडून जागोजागी पाण्याची सोय केली होती. बिस्कीट, नाश्ता, चहा, केळी वाटप केल्याचे दिसून आले. संध्याकाळी पाच वाजता पालखी सोहळा संचेती चौकात दाखल झाला होता. त्यानंतर पालखीने नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदीराकडे प्रस्थान केले.
दोन्ही संताच्या पालख्या शहरात मुक्कामी असल्यामुळे भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. पुणेकरांनी दुपारपासूनच पालख्यांचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुर्तफा शहरवासियांसह भाविकांनी गर्दी केली होती. प्रत्येकाच्या मनात ‘धन्य आजि दिन झाले संतांचे दर्शन‘ अशीच भावना असल्याचे प्रेरित होत होते. शहरासह उपनगरांतही माऊलींच्या जयघोषात भाविक न्हाऊन निघाले होते. लहान मुलांचा वारकरी पोशाख, अबालवृद्धांची दर्शनाची लगबग, वारकर्यांना नाश्ता, चहा, जेवण देण्यासाठी स्थानिकांची गडबड सुरू असल्यामुळे वैष्णवांच्या मेळावा उत्साहपुर्ण वातावरण पुण्यनगरीत दाखल झाला. मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोहचण्यासाठी तुकारामांच्या पालखीने विसावा संपल्यानंतर लगेचच नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदीराकडे प्रस्थान केले.
पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षी करण्यात आली. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा संकचेती चौकात पोहोचला होता. त्यावेळेस हेलिकॉप्टरने संत तुकाराम महाराज यांच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यावेळी भाविकांकडून विठू नामाचा जयजयकार करण्यात आला. हेलिकॉप्टर द्वारे तीन वेळा पुष्पृष्टी करण्यात आली. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी विठू नामाचा गजर केला.
पालखी सोहळा वेळेतच दाखल
ऊन वारा पाऊस याचा सामना करत दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रात्रीच्या सुमारास शहरात दाखल होत होता. यंदा मात्र, पालखी सोहळा व्यवस्थापन कमिटीने अतिशय सूक्ष्म पध्दतीने वेळेचे नियोजन केले होते. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही पालखी सोहळे अंधार पडण्याआधीच पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पोहचले होते. विशेषता पावसाची रंगत अधेमध्ये सुरू असताना देखील पालखी सोहळ्याने वेळेमध्ये अंतर पार केले. त्यामुळे पुणेकरांना पालखी सोहळ्याचे दर्शन वेळेत घेता आले.