देशभरातील सर्वोत्तम १०० मध्ये महाराष्ट्रातील १९ विद्यार्थ्यांचा गौरव
marathinews24.com
पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय वीरगाथा ५ स्पर्धेत राज्यातील १९ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
भ्रमंती ही मनाला सुखद अनुभव देणारी गोष्ट – डॉ. राधा मंगेशकर यांचे मत – सविस्तर बातमी
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार व संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने नागरिक तसेच सशस्र दलातील अधिकारी यांच्या शौर्य व बलिदानाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी शौर्य पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिले जातात. शुरांच्या प्रेरक जीवनकथा विद्यार्थांमध्ये रुजवण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये नागरी सजगतेची भावना निर्माण करण्यासाठी वीरगाथा प्रकल्प २०२१ मध्ये सुरू करण्यात आला. वीरगाथा स्पर्धा देशभरातील सर्व २८ राज्यातील व ८ केंद्रशासित प्रदेशातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी कार्यान्वित करण्यात येत असतात.
महाराष्ट्रातून शाळापातळीवर ३ लाख २२ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी जिल्हापातळीवरून ५ हजार ५९ प्रवेशिकांची राज्यपातळीवर निवड करण्यात आली. निवडल्या गेलेल्या प्रवेशिकांपैकी उत्कृष्ट ४०२ प्रवेशिका राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात आल्या होत्या.
राष्ट्रीय स्तरावर नियुक्त केलेल्या समितीने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या राज्य नोडल अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या प्रवेशिका मधून १०० सर्वोत्तम प्रवेशिकांची निवड केली आहे. सदर निवडक सर्वोत्तम विजेत्यांना दिल्ली येथे विशेष अतिथी म्हणून २६ जानेवारी, २०२६ चे संचलन पाहता येणार आहे. तसेच संरक्षण मंत्रालयाकडून संरक्षण मंत्री यांच्या हस्ते सर्वोत्तम १०० विजेत्यांना प्रत्येकी रुपये १० हजार पारितोषिक, प्रमाणपत्र व पदक प्रदान केले जाणार आहे. या सर्वोत्तम १०० विद्यार्थ्यांपैकी राज्यातील १९ विद्यार्थ्यांनी यावर्षी यश संपादन केले.
यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचे नाव, गट, शाळेचे नाव व प्रकार पुढीलप्रमाणे
गट 3-5 मध्ये सान्हवी शशांक भिंगार्दे-पी.एस.बी. बने इंटरनॅशनल स्कूल, सडवल (कविता). वर्धन समीर फलके, विद्यामंदिर, बचनी कोल्हापूर, (चित्रकला). जान्हवी सचिन खोत, झेङ पी. शाळा, जुळेवाडी, सांगली(परिच्छेद). वेदिका प्रविण कवितके, सिध्दनाथ पी. विद्यालय, दहिवडी, सातारा ( परिच्छेद). विधी प्रदीप वानखडे श्रीमती राधादेवी गोयंका विद्यामंदिर हायस्कूल, अकोला (चित्रकला). मंजुश्री घोरपडे, जि. प. प्रा. शाळा अथणी अहिल्यानगर (परिच्छेद).
गट 6-8 मध्ये अर्पित अविनाश जाधव, जि. प. प्रा. शाळा, आलेवाडी सातारा (मल्टी मीडिया सादरीकरण). श्रावणी शेखर संकपाळ, इंग्लिश मीडियम हायस्कूल, नाडे सातारा (कविता). शिंवाक खोडे, भवन्स भगवानदास पुराहित विद्या मंदिर नागरपूर (चित्रकला), सावी वैभव मुद्राळे कासार्डे माध्यमिक विद्यालय, सिंधुदुर्ग (मल्टी मीडिया सादरीकरण). श्रेया मुकुंद उंबरकर जवाहर विद्या, आणि कला उच्च एस. जामठी ब्र. अकोला (परिच्छेद). आदित्य अभय गायकवाड संत तुकाराम नॅशलन मॉडेल स्कूल, लातूर (परिच्छेद). शेर्य शंकर लेकुळे स्विस अकादमी इंग्लिश स्कूल, हिंगोली (चित्रकला). आरोही प्रवीण पावडे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी अहिल्यानगर (चित्रकला). शमिका सदू गवंडी झेडपीपीएस क्रमांक 1, सिंधुदुर्ग (परिच्छेद).
गट 9-10 मध्ये अवनी खोरी जगमा वर्ल्ड स्कूल, खेड-दिगर, नंदुरबार (चित्रकला). समिक्ष शशिकांत मोझर, बी.एस. माण्ध्यमिक वि. मोरजीवाडा, सातारा (परिच्छेद).
गट 11-12 मध्ये येलमार दीक्षा बाहासाहेब, भारतमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, मायणी , सातारा (परिच्छेद). सिध्दी शंकर रामुगडे, कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड, सातारा (परिच्छेद).
या सर्व विजेत्यांचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अभिनंदन केले आहे. या सर्व उपक्रमांचे मार्गदर्शन शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व आयुक्त यांनी केले आहे तसेच राज्यस्तरावरून या उपक्रमांची अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व अधिनस्त सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी केली होती. पुढील वर्षी अधिकाधिक संख्येने सर्व शाळा व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन संचालक राहूल रेखावार यांनी केले आहे.





















