मातृभूमीच्या भक्ती आणि शक्तीचे घडले दर्शन
marathinews24.com
पुणे – वंदेमातरम्, भारतभूचा महामंत्र हा गाऊनी मातेला नमितो, भारतभूमि पुण्यभूमी, माता होईल सश्यशालिनी, जा झणी जा वीरा तुम्ही मातृ रक्षणा, आई तुझ्याच चरणी, येई रणचंडीके अशा भारत मातेच्या रक्षणासाठी भक्तीवीर रस जागविणाऱ्या नाट्यगीतांनी रसिकांच्या मनात मातृभूमी प्रेमाचे स्फुल्लिंग जागविले.
रंगली सलग १०१ गीतांची सुरेल विक्रमी मैफल – सविस्तर बातमी
निमित्त होते वंदे मातरम् या राष्ट्रमंत्राच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्ताने व नवरात्रातील दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती यांचे एकत्रित स्वरूप असणाऱ्या जगन्मातेचे, भारतमातेचे गौरवगान असणाऱ्या संगीत आनंदमठ या नाटकातील गीतांच्या अनोख्या मैफलीचे. हा विशेष कार्यक्रम डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात भारतभूचा महामंत्र नांदीने करण्यात आली. हरे मुरारे मधुकैटभ हरे, आत्मविस्तृता, तव भ्राता मम हाती ग, धन्य मी होईन गुरुदेवा, जगून घे सखया अशा गीतांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या अजरामर साहित्यकृतीवर आधारित संगीत आनंदमठ या नाटकातील गीतांचे वैशिष्ट्य सांगताना इंग्रज शासकांचा उदयकाळ, याच काळात बंगालमध्ये झालेला दुष्काळाचा कहर, त्यातही सार वसूल करण्याचा इंग्रज अधिकाऱ्याचा निर्दयी हुकुम या दमनचक्रात बंगालची जनता भरडून निघाली. या परिस्थितीत इंग्रजांविरुद्ध संतांनांनी केलेले बंड यावर आधारित असलेली ही नाट्यकृती होय. यातील गीते विनिता तेलंग यांनी लिहिली असून संगीत अजय पराड यांचे आहे. निर्मिती आणि दिग्दर्शन रवींद्र सातपुते यांचे आहे.
वंदे मारतम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस नाटकाचे सूत्रधार आहेत. मैफलीत अनुष्का आपटे, वज्रांग आफळे, अनुजा जोशी, ओंकार कपलाने, पार्थ बापट यांनी जोशपूर्ण आवाजात गीते सादर केली. अजय पराड (संवादिनी), हिमांशु जोशी (ऑर्गन), कौशिक केळकर (तबला) आणि स्वप्नील कुंभार (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. संचिता जोशी, बद्रिश कट्टी यांनी प्रभावीपणे निवेदन करून प्रसंग अधिक उठावदार केले.
प्रास्ताविकात डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे म्हणाले, नवरात्रीनिमित्त वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम सादर करावा, अशी संकल्पना समोर आल्यानंतर भारतमातेला वंदन करून नवदुर्गांचा उत्सव साजरा व्हावा आणि प्रत्येक देशवासीयाच्या मनातली मातृभूमीविषयी असलेली प्रेमआदर भावना जागृत व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.






















