बीड वाचतंय अभियानांतर्गत सरहद संस्थेचा पुढाकार
marathinews24.com
पुणे – सरहद पुणे, आर्हम फाउंडेशन आणि समिधा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “बीड वाचतंय” अभियानांतर्गत सरहद संस्थेचा यंदाचा स्वामी रामानंद तीर्थ जीवन गौरव पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या त्याग, संघर्ष आणि समाजहितकारी विचारांतून प्रेरणा घेऊन मराठवाड्यातील सामाजिक तणाव, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तरुणाईमध्ये एक सकारात्मक चळवळ निर्माण व्हावी हा या अभियानामागचा प्राथमिक हेतू आहे.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त कार्यक्रम व आरोग्य शिबिराचे आयोजन – सविस्तर बातमी
डॉ. सतीश साळुंखे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम आणि बीड जिल्ह्याच्या इतिहासाचा सखोल अभ्यास व लेखन करून त्यातील प्रेरणादायी कथा समाजापर्यंत पोहोचवण्यासोबतच इतर अनेक सामाजिक कामांमध्ये ते सक्रिय सहभागी असतात. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून यंदाचा स्वामी रामानंद तीर्थ जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार समारंभ दिनांक ३ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे येथे पार पडणार आहे. सकाळचे संपादक मा. सम्राट फडणीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असून, मा. रवींद्र बिनवडे (भा प्र से ) अध्यक्षस्थान भूषवतील. तसेच डॉ. प्रशांत खरात व ज्येष्ठ साहित्यिक कौतिकराव ठाले पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती सरहदचे समन्वयक लेशपाल जवळगे व डॉ. शैलेश पगारिया यांनी दिली.






















