चित्र प्रदर्शनास सुरुवात
marathinews24.com
पुणे – वंदे मातरम्’ हे गीत क्रांतिकारकांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे प्रेरणागीत होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा संघर्ष जसा व्यक्त होत आहे त्याचप्रमाणे भविष्यातील भारत कसा असेल याचेही प्रतिबिंब प्रदर्शनात उमटले आहे. ‘वंदे मातरम्’ या गीताची चित्रांच्या माध्यमातून लहान-थोरांनी पूजाच मांडली आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी काढले. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्ष पूर्तीनिमित्ताने आर्ट इंडिया फाउंडेशन, वंदे मातरम् सार्ध शती जयंती समारोह समितीतर्फे ‘वंदे मातरम्’ कलाकृतींमधून देशप्रेम व्यक्त करणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि. ९) पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस, इतिहास संकलन समितीचे अरुणचंद्र पाठक, आर्ट इंडिया फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. प्राची साठे, विश्वस्त चित्रा वैद्य मंचावर होते. दरम्यान, ‘वंदे मातरम्’ या विषयावर घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील बक्षिसपात्र व निवडक १८० कलाकृतींचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे. प्रदर्शन दि. ११ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात सर्वांसाठी खुले आहे.
बलकवडे पुढे म्हणाले, देशाची वाटचाल कशी झाली हे चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या आदर्श संस्कृतीचेही दर्शन घडत आहे. सातासमुद्रापार असलेल्या युवकांकडूनही देशभक्तीची भावना व्यक्त होत आहे. अनेक गीतांना इतिहास असतो परंतु ‘वंदे मातरम्’ या गीताने इतिहास घडविला आहे, असे सांगून चारुहास पंडित यांनी देशाचे भवितव्य बालक-युवकांच्या हाती सुरक्षित आहे, हे अर्कचित्र रेखाटून स्पष्ट केले. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५०व्या वर्ष पूर्तीनिमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यात भारतासह विविध देशांतून २ हजार ५०० पेक्षा जास्त कलाकारांनी उत्साहाने सहभाग नोंदविला होता, असे चित्रा वैद्य यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघर्षाच्या गाथेबरोबरच भविष्यातील भारताचे प्रतिबिंब-इतिहासकार पांडुरंग बलकवडेसुरुवातीस ‘वंद्य वंदे मातरम्’ हे गीत मृणाल वेर्णेकर यांनी सादर केले. सूत्रसंचालन माधुरी जोशी यांनी केले. प्रमोद, परिमल चौधरी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.























