पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमधील म्हाळुंगे, चाकण, भोसरी एमआयडीसी या औद्योगिक पट्यातील २६ सराइत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत. म्हाळुंगे एमआयडीसीमधील तीन, भोसरीतील ११, चाकणमधील एक, चिखलीमधील आठ, दिघीतील तीन अशा २६ सराइत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. यामध्ये १९ जणांना दोन तर सात जणांना एका वर्षासाठी तडीपार केले असून याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी दिले आहेत.
साडेसहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शरद ज्ञानेश्वर मोरे (२७, मुळशी) याला दोन वर्षांसाठी तर स्वयम सबाजी सावंत (२७), सोनू बहिरू केदारी (२९, खेड) या दोघांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. भोसरी एमआयडीसीच्या ठाण्याच्या हद्दीतील जीके उर्फ गणेश संतोष कोठावळे (१९, चिखली) याच्या टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
टोळीतील सदस्य ससा उर्फ प्रतीक कैलास गजरमल (१९, चिंचवड), रोहित राजू बजलव (चिखली), व्ही पी उर्फ विशाल हनुमंत पोळ (२१, चिखली), बच्चा उर्फ दिग्विजय अनंत गायकवाड (१९, चिंचवड) यांच्यावर कारवाई झाली आहे. या टोळीवर गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. केतन सोनवणे उर्फ चेप्या (२६, पिंपरी), सचिन बाळू धांडे (२०), दीपक गोरख धांडे (२४), राहुल भारत जाधव (२०) यांना दोन वर्षांसाठी तर विजय बाळासाहेब साळवे (२२, मोशी), ज्ञानेश्वर वसंत दुनघव (२२) यांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. चाकण पोलीस ठाण्यातील नंदा रंगनाथ साळुंके (५०) हिला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तिच्यावर गांजा विक्री प्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत.
चिखीलीतील आकाश उर्फ सुमित उर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहळ (१९), संग्राम दत्तात्रय पवार (२९, चिखली), सुमित गणेश पिल्ले (३२), कनिष्काराज उर्फ राणा अरुण सुरवसे (२१, चिखली), कुणाल बाळकृष्ण भंडारी (२३, मोईगाव, खेड) यांना दोन तर तेजस निलेश गायकवाड (२०), रोहन शंकर पंडित (२३, चिखली) यांना पुणे जिल्ह्यातून आणि मारुती मांजरीया राठोड (४५, निगडी) याला एक वर्षासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून तडीपार केले आहे. दिघी ठाण्याच्या हद्दीतील गजानन गोविंद भोसले (२८, लोहगाव, पुणे), जयंता हरिपद सरकार (२९, दिघी), अक्षय नंदू पठारे (२०, चऱ्होली) यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार म्हणाले, जानेवारी ते मे २०२५ या कालावधी परिमंडळ तीनच्या हद्दीतील ९१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष आहे.