नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्यावतीने मागणी
marathinews24.com
पुणे – प्रक्षोभक विधाने करणाऱ्या नेत्यांना भाषण बंदी करा – जिल्ह्यातील यवत येथील मुस्लिम विरोधी दंगल ही पूर्वनियोजित कटाचा भाग असून राज्य सरकारने महाराष्ट्राचे पुरोगामीत्व व महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या दंगलीतील सर्व संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच या घटनेला कारण ठरणाऱ्या प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांविरुद्ध देखील कारवाई करावी अशी मागणी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह केली पोस्ट, यवतमध्ये दोन गटात तणाव – सविस्तर बातमी
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची राहुल डंबाळे , पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , सलिम पटेल, शहाबुद्दन शेख , आसिफ खान , जावेद शेख , यांच्यासह इतर मान्यवरांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन यवत येथील घटनेचा निषेध नोंदवला.
“ राज्यात सर्वत्र अस्वस्थता असून मुस्लिम विरोधी वातावरण सातत्याने पसरवण्याचा अजेंडा काही आमदार राबवत आहेत. भाजपचे प्रक्षोभक भाषण करण्यासाठी प्रसिद्ध असणारे आमदार ज्या ठिकाणी सभा करतात त्या ठिकाणी अशा प्रकारच्या दंगली घडताना दिसत आहेत , त्यामुळे राज्य सरकारने प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांच्या सभांवर बंदी आणावी व अशा प्रकारची दंगलीची पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना तात्काळ अटक करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान यवतच्या घटनेचे जिल्ह्यात व राज्यात कुठेही पडसाद उमटू नयेत यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पुरोगामी कार्यकर्त्यांच्या वतीने राज्यातील नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता ठेवावी असे आवाहन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.























