पत्नी, सावत्र मुलांसह तिघांवर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कौटुंबिक कलहासह पत्नी, सावत्र मुलांकडून होणार्या छळाला आणि जादूटोण्याच्या त्रासाला कंटाळून ५३ वर्षीय रियल इस्टेट व्यावसायिकाने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. शुक्रवार पेठतील मध्यवर्ती भागात ही घटना घडली. राजीव मनोहर पायगुडे (वय ५३, रा. शुक्रवार पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मनिषा ऊर्फ मंगल पायगुडे, सावत्र मुलगी स्मृती, सावत्र मुलगा रोहित यांच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र मनोहर पायगुडे (वय ५५, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
मौजमजेसाठी दुचाकींची चोरी, अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव पायगुडे यांचा मनिषा ऊर्फ मंगल हिच्यासोबत दुसरे लग्न झाले होते. मनिषाला यापुर्वीची स्मृती आणि रोहित ही दोन मुले होती. लग्नानंतर हे सर्वजण शुक्रवार पेठेत एकत्र राहत होते. लग्न झाले तेव्हा सर्वकाही सुरळीत सुरू होते, मात्र काही काळानंतर घरात कौटुंबिक वादाची ठिणगी पडली. पत्नी आणि तिची मुले राजीव यांना विनाकारण मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागली. राजीव आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून सतत वाद सुरू होते. २० एप्रिल २०२६ रोजी राजीव यांनी आपले मोठे भाऊ रवींद्र यांना फोन केला होता. त्यांनी वैतागलेल्या अवस्थेत पत्नी आणि सावत्र मुले छळ करत असल्याची व्यथा मांडली होती. तसेच ते सतत पैशांची मागणी करत असून मारहाण करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
राजीव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी त्यांना झालेल्या त्रासाचा पाढा वाचला. ‘पत्नी मनिषा, स्मृती आणि रोहित हे त्याना वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होते. मनिषा माझ्यावर जादूटोणा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. मला पैशांसाठी छळले जात असून आता मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही,’ अशी चिठ्ठी त्यांनी मृत्युपूर्वी लिहिली होती. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयसिंग दाढे तपास करत आहेत.






















