शिवसेना श्रमिक सेनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष चव्हाण यांचा आरोप
marathinews24.com
पुणे – कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठावल्यामुळे बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या हस्तकाकडून जीवे मारण्याची धमकी ददिल्याचा गंभीर आरोप शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, याबाबत बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
थकीत वेतनासाठी लाच स्वीकारली, इंदापूरात लिपिकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
मुंबईतील रेल्वे वाडीबंदर डेपो येथे कार्यरत असलेल्या ७५० कामगारांचे नॅशनल हॉलिडे, पेड लिव्ह, ग्रॅज्युइटी आणि काहींचा पगार थकविल्याची तक्रार कामगारांनी चव्हाण यांच्याकडे केली होती. संबंधित तक्रार आल्यानंतर चव्हाण यांनी कंपनीशी तीन वेळा पत्रव्यवहार केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीकडून दाद न मिळाल्याने रितसर परवानगी घेऊन कंपनीच्या गेटसमोर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कंपनीचे मालक हनुमंत गायकवाड, दत्ता गायकवाड आणि रवी देशपांडे उपस्थित राहून काही रक्कम तत्काळ देण्याचे आणि उर्वरित रक्कम दिवाळीनंतर देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
आश्वासनानुसार काही रक्कम कामगारांच्या खात्यात जमा झाली, त्यामुळे आंदोलन स्थगित केले. दिवाळीनंतर उर्वरित रकमेबाबत पाठपुरावा केला असता कंपनीकडून टाळाटाळ केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी चव्हाण कामगारांना भेटण्यासाठी वाडीबंदर डेपो येथे गेले असता, त्यांनी पुन्हा गायकवाड यांना देयकाबाबत संपर्क साधला. त्यानंतर लगेचच विक्की गायकवाड नावाच्या व्यक्तीने फोन करून बीव्हीजीकडून आम्हाला हप्ते मिळतात, कामगारांच्या पैशासाठी त्रास देऊ नका, नाहीतर ठार मारू, अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे.























