सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – आधारकार्डचा गैरवापर झाला असून, या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येणार आहे, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका संगणक अभियंता महिलेची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.
शेअरमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४१ वर्षीय महिला नवी पेठेत राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. ‘आधारकार्डचा गैरवापर करण्यात आला आहे. आधारकार्डचा वापर करुन मुंबईतील हाॅटेलमध्ये खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. हाॅटेलमधील खाेल्या आरक्षित करणारे गुन्हेगार आहेत, अशी भीती दाखविली. या प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील’, असे चोरट्यांनी महिलेला सांगितले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने १४ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अरुण घाेडके तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३२ वर्षीय महिला सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर जानेवारी महिन्यात संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला गुंतवणूक करण्यास सांगितले. गेल्या पाच महिन्यात चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. चाेरट्यांच्या खात्यात महिलेने ऑनलाइन पद्धतीने २५ लाख रुपये जमा केले. महिलेला परतावा न देता फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास कत आहेत.
दुकानातील छताचे पत्रे उचकटून गल्ल्यातील रोकड चोरीला
दुकानातील छताचे पत्रे उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील पावणेदोन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली. याबाबत दुकानदाराने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादाराचे धानाेरीतील श्री विठ्ठल मंदिर परिसरात कृष्णा प्लायवुड हे दुकान आहे. चोरट्यांनी २० मे रोजी मध्यरात्री दुकानाच्या छतावरील पत्रे उचकटले. दोरीचा वापर करुन चोरटे दुकानात उतरले. त्यानंतर चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक लाखे तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वस्त्र दालन, मद्य, तसेच ओैषध, किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरीच्या घटना वाढल्या आहेत.























