रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील विविध भागात शेतकऱ्यांकडील शेळी-बोकडांची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून ५ बोकड, शेळी, चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश कैलास ब्राह्मणे (वय २१) आणि सुनील अण्णाभाऊ माळी (वय २४, दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
भांडणाच्या रागातून कुटूंबियाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेळी-बोकड चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोहीम राबवली. पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार धनराज शिंदे, अंमलदार ओंकार कुंतलवाड, योगेश गुंड, किशोर शिपलकर, विनीत भोसर, संदीप जाधव, योगेश वाहेकर यांनी तांत्रिक विश्लेषण केले. अमलदार योगेश गुंड यांच्या माहितीद्वारे पथकाने आरोपींचा माग काढला. तब्बल १८० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने दोघांना अटक केली.
तपासात आरोपींनी बाभुळसर खुर्द, करंजगाव, वाघोली, गणगाव खालसा तसेच शिरूर तालुका परिसरातून शेळी-बोकड चोरी केल्याची कबुली दिली. चोरीस गेलेली जनावरे संबंधित शेतकऱ्यांना परत देण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या पथकाने पार पडली. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध पाच गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपास सुरू आहे. कारवाईमुळे शेळी-बोकड चोरांना मोठा आळा बसणार आहे.




















