कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
marathinews24.com
पुणे – (रेवण कोळेकर) राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातले असून त्याचा फटका राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून आणलेले पीक हातातोंडाशी आलेले असताना अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले आहे. राज्यात तब्बल ४२ लाख एकर क्षेत्रावरील पिकांना या पावसाचा जबर फटका बसल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले असून गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यातील १९५ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आत्तापर्यंत १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर म्हणजेच ४१ लाख ८४ हजार ८४६ एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. यात प्रामुख्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले असून यामध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळफिके, बाजरी, कांदा, ऊस, ज्वारी, हळद या पिकांना सर्वाधिक मोठा फटका बसला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यातील नांदेड, वाशिम, यवतमाळ, अकोला, सोलापूर, सांगली, हिंगोली, धाराशिव, परभणी, जळगाव, अमरावती, वर्धा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे.
सर्वाधिक शेती क्षेत्राचे नुकसान झालेले जिल्हे
नांदेड – ७,२८,०४९ हेक्टर
वाशिम – २,०३,०९८ हेक्टर
यवतमाळ – ३,१८,८६० हेक्टर
धाराशिव – १,५८,६१० हेक्टर
अकोला – १,७७,४६६ हेक्टर
सोलापूर – ४७,२६६ हेक्टर
बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर
शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत
ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात देण्यात आली आहे. काही राहिलेल्या क्षेत्राच्या पंचनामेचे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची शासन स्तरावर उपयोजना सुरू आहे असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा विश्वास कृषिमंत्री भरणे यांनी त्यांनी व्यक्त केला.




















