लोकमान्यनगरमधील नागरिकांना दिला आधार
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती लोकमान्यनगर पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते व विधीमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. लोकमान्यनगर पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या स्थगितीवर तीव्र आक्षेप घेत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पाठिंबा दर्शवला.
आदित्य ठाकरे म्हणाले, लोकमान्यनगर वासियांच्या पाठीशी मी उभा आहे. स्थानिक आमदाराने शिफारस केल्यानंतर लगेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. हा निर्णय संशयास्पद असून नागरिकांवर अन्याय करणारा आहे,” असा आरोप त्यांनी केला. भविष्यात जर या ठिकाणी जबरदस्तीने बुलडोझर फिरवण्यात आला, तर त्यासमोर पहिल्यांदा मी उभा राहीन. लोकांच्या घरांवर, त्यांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही. सरकारने तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत लोकमान्य नगरच्या नागरिकांसोबत राहणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. ॲड. गणेश सातपुते यांनीही सरकारवर कडाडून टीका केली. सरकारने तातडीने नागरिकांशी संवाद साधून आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे,” असे ते म्हणाले.
नागरिकांचा संताप हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. लोकांना अंधारात ठेवून निर्णय घेण्यात येत आहेत. जर गरज पडली, तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. लोकमान्यनगरमधील रहिवासी कुटुंबासहित मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर लोकमान्यनगर बचाव कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
पुण्यात आता ‘छोटा अडाणी’ कोणाला बनवायचा प्रयत्न सुरू आहे का? लोकमान्य नगरचा साडे सोळा एकरचा मौल्यवान भूखंड कुणाच्या घशात घालण्याचा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. लोकांच्या हक्कांवर डल्ला मारण्याचा हा प्रयत्न आम्ही रस्त्यावर उतरून, जनतेच्या ताकदीने उधळून लावू, असेही आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
























