निसर्गोपचार माणूस व निसर्ग यांच्यातील समतोल साधणारी जीवनशैली-राज्यपाल आचार्य देवव्रत

निसर्गोपचार माणूस व निसर्ग यांच्यातील समतोल साधणारी जीवनशैली-राज्यपाल आचार्य देवव्रत

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे तीन दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाचा समारोप

marathinews24.com

पुणे – निसर्गोपचार ही केवळ उपचारपद्धती नाही, तर निसर्ग आणि माणूस यांच्यात समतोल साधणारी जीवनशैली आहे. निरोगी, आत्मनिर्भर आणि अध्यात्मिक अधिष्ठान असलेला सदृढ समाज घडण्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेला निसर्गोपचाराचा हा वैचारिक वारसा आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी-एनआयएन) आठव्या निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाच्या समारोपावेळी ते बोलत होते. येवलेवाडी येथील निसर्ग ग्राम परिसरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख अतिथी होती. प्रसंगी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल सुचिता जोशी, ‘एनआयएन’चे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह व्यासपीठावर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष अनंत बिरादार उपस्थित होते.

राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना – सविस्तर बातमी 

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या वतीने प्रकाशित पुस्तकाचे, संस्थेवरील विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले. तसेच १५६ व्या गांधी जयंतीनिमित्त घेतलेल्या आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वैद्यकीय प्रश्नमंजुषा, वक्तृत्व-निबंध, संशोधन पेपर सादरीकरण,फिजकल्टोपॅथी, रील्स आदी स्पर्धांमधील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. कार्यक्रमात दादाजी डॉ. दिनशा के. मेहता पुरस्कार (उत्कृष्ट तज्ज्ञ) व डॉ. एस. एन. मूर्ती पुरस्कार (उत्कृष्ट पी.जी. विद्यार्थी) पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्राध्यापक डॉ. सत्यनाथ, ओमप्रकाश शुक्ला, मंदार देशपांडे, सौरभ साकल्ले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी महोत्सवाचे यशस्वी संयोजन केले.

महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेत येऊन आनंद झाला असल्याचा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यांनी केला. ते म्हणाले, “महात्मा गांधी यांनी नैसर्गिक जीवन व आरोग्याची सांगड घालत आत्मनिर्भरतेचा संदेश दिला. निसर्गोपचार दिवसाच्या निमित्ताने होत असलेला हा महोत्सव त्यांच्या या विचारांचा जागर आहे. निसर्गोपचारावर विश्वास ठेवून गांधीजींनी आयुष्यभर त्याचे पालन केले. मानवता जपणारा हा विचार आचरणात आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यानिमित्ताने आपण निसर्गोपचार, चांगले आरोग्य याबाबत जागरूकता निर्माण करू, संशोधनाला प्रोत्साहन देऊ आणि प्रत्येक व्यक्तीला निसर्गाच्या ज्ञानाच्या माध्यमातून निरोगी व आनंदी जीवनाकडे प्रेरित करू, असा संकल्प करूया.”

“निसर्गाशी एकरूप होत संतुलित आहार, योग्य व्यायाम, सकारात्मक चिंतन व चांगली जीवनशैली अंगिकारली, तर शरीरातील रोगांना बरे करण्याची ऊर्जा शरीरातच तयार होते. आज जगभर जीवनशैलीजन्य आजार आणि तणावाचे प्रमाण वाढत असून, अनेक लोक औषधांवर अवलंबून झाले आहेत. अशावेळी निसर्गोपचार आपल्याला चांगल्या आरोग्याकडे नेणारा सोपा मार्ग आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अभियानाला साकार करण्यात निसर्गोपचार महत्वाची भूमिका बजावेल. पंचमहाभूतांच्या शक्तीचा उपयोग करून आपण केवळ रुग्णांना निसर्गोपचार करू शकतो असे नाही, तर एक सक्षम आणि शाश्वत आरोग्यव्यवस्था उभारण्यातही मोलाचे योगदान देऊ शकतो.”

प्रतापराव जाधव म्हणाले, “चांगल्या स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली, रसायनमुक्त आहार घेण्यासह निसर्गाशी एकरूप एकरूप होण्याची आवश्यकता आहे. निसर्गोपचार बाबतीत गांधीजींनी केलेले कार्य, त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. आजच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जगात जीवनशैली संदर्भात आजार वाढत आहेत. योग आणि नैसर्गिक जीवनशैली आपल्या जीवनाचा आधार आहे. त्यात सुधारणा करायला हवेत. आपली दिनचर्या चांगली ठेवली, तर निरोगी जीवनाचे उद्दिष्ट प्राप्त होईल. स्वास्थ्य विकत घेता येत नाही, ते कमवावे लागते. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. आपण निसर्गाशी प्रामाणिक राहत त्याला परत करायला हवे. तसे केले, तर पृथ्वीचे आरोग्य चांगले राहते.”

राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुचिता जोशी व डॉ. कविता जैन यांनीही आपले विचार मांडले. अमरेंद्र सिंह यांनी कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक केले. प्राध्यापक डॉ. डी. सत्यनाथ यांनी आभार मानले. ‘निसर्गोपचाराच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे’ या संकल्पनेवर आयोजित तीन दिवसाच्या या खाद्य महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ही सर्व माहिती ‘एनआयएन’चे प्रकाशन अधिकारी सौरभ साकल्ले यांनी दिली. अनंत बिरादार यांनी निसर्गोपचार दिवसानिमित्त मनोगत व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×