जामखेड गोळीबार प्रकरण
marathinews24.com
पुणे – कुख्यात गुंड सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी कुस्ती आखाड्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर घायवळ टोळीने ४ मार्च २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये मोहोळकर याच्यावर गोळीबार केला होता. जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
केजजवळ ‘दी बर्निंग बसचा थरार; २८ प्रवासी जखमी – सविस्तर बातमी
गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर मोहोळकर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. ४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास जामखेडमधील नुराणी कॉलनी परिसरात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सागर मोहोळकरवर ५ ते ७ राऊंड गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्याला चार गोळ्या लागल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जामखेड येथून त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.
मोहोळकर याच्यावर कुख्यात गुंड नीलेश घायवळ गँगचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. परदेशातूनच घायवळने हा हल्ला घडवून आणल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सागर मोहोळकरने घायवळला मारहाण केल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिमन्यू पोते (वय २४, रा. जामखेड) याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सागर मोहोळकरवर यापूर्वी खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. गोळीबार आणि मृत्यू प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.





















