दाखल झालेला गुन्हा खोटा व निराधार;अन्यायाविरोधात न्यायालयात जाणार
marathinews24.com
पुणे – बहुचर्चित अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी किंवा अमेडिया कंपनीचे इतर भागीदार यांच्याशी माझा कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यांचा परिचय नसून, मी त्यांना कधी भेटलोही नाही. त्यामुळे माझा दाखल गुन्ह्याशी काही संबंध नाही. हा दाखल झालेला गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार आहे,” असे स्पष्टीकरण बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी पत्रकार परिषदेत दिले. प्रसंगी जागेचे इनामी (मूळ मालक) विद्वांस उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु – सविस्तर बातमी
हेमंत गवंडे म्हणाले, “मौजे बोपोडी येथील सीटीएस नं. ३ व ४, प्लॉट नं. १४ (सर्वे नं. ६२) ही जमीन पेशवे काळापासून विद्वांस यांच्याकडे आहे. मोडी लिपीमध्ये याचे कागदपत्र उपलब्ध आहेत. १९३० पासून या जागेचा सातबारा विद्वांस यांच्या नावावर आहे. कृषी महाविद्यालय या जागेवर भाडेकरू असून, ते मालक नाहीत. विद्वांस यांचे इनाम कधीही काढलेले नसून, ते आतापर्यंत कायम आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या जागेबाबत याचिका दाखल करून आम्ही मालक असल्याचा दावा केला. पण न्यायालयाने ते अपील फेटाळून लावले आहे. कारण या जागेवर विद्वांस यांची मालकी दिसून आली आहे. कृषी महाविद्यालय यांच्याकडे कोणती मालकी पुरावे नाहीत.”
हेमंत गवंडे म्हणाले, “कृषी महाविद्यालयांकडे संबंधित जागेचे कोणते कागदपत्र नसल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सांगितले आहे. यशदा विद्वांस यांचे नाव या जागेवर होते आणि कृषी महाविद्यालय यांचे भाडेकरू म्हणून नेमण्यात आले आहे. १९७५ पासून आतापर्यंत कृषी महाविद्यालय यांनी याबाबत कोणते अपील केलेले नाही. कुठेही आरडाओरड करून जागा ताब्यात घेता येत नाही. खासगी जागेवर आरक्षण हे पडत असते. पण सरकारी जागेवर बस टर्मिनल आरक्षण १९८७ रोजी पडलेले आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी आम्हाला जागा मालक म्हणून पत्र पाठवून या जागेवर बस टर्मिनलसाठी जागा असल्याचे सांगितले आहे. त्यातही आमचा मालकी हक्क नमूद केलेला आहे. २० कोटी रुपये भरपाई मोबदला देण्याचे मनपाने सांगितले. मात्र, आम्ही ते अद्याप घेतलेले नाही. आमची बस टर्मिनल करण्यासाठी मान्यता देखील आहे.”
“या जागेवर आम्ही कोणती खोटी मोजणी केलेली नसून, भूसंपादन मोजणी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात झाली आहे. प्रॉपर्टी कार्डवरदेखील माझे नाव आहे. त्याचा नियमित कर आम्ही भरतो आहोत. याबाबत कृषी महाविद्यालय यांनी कधी आव्हान दिलेले नाही. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी माझ्यावर पदाचा दुरुपयोग करत खोटा गुन्हा दाखल केला होता. परंतु उच्च न्यायालयाने तो गुन्हा खोटा पद्धतीने दाखल केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे खडसे यांचे मंत्री पददेखील गेले आहे. काही महसूल अधिकारी महसूल मंत्री यांना दिशाभूल करत आहे. माझी नाहक बदनामी झाली आहे. मी ही जागा कायदेशीर खरेदी केलेली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
उच्च न्यायालयात दाद मागणार
माझा आणि अमेडिया कंपनीचा कोणताही संबंध नाही. आमच्यात कोणताही व्यवहार झालेला नाही. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करतोय, त्याचा अभ्यास करून कागदपत्रे तपासून दाखल करायला हवे होते. मात्र, रात्री दीड वाजता गुन्हा दाखल केला गेला आहे. शीतल तेजवानी यांना मी कोणतीही जागा विकलेली नाही. तेजवानी यांनी माझी जागा विक्री केल्याचे सांगितले जाते. पण त्याबाबत कोणते दस्त नाही. माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला तो रद्द करण्यात यावा. याप्रकरणात तहसलीदार यांचे निलंबन झाल्याचे सांगण्यात येते तर, त्यांची ऑर्डर तपासून पाहावे. माझ्याविरोधात ज्यांनी खोटी तक्रार केली, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहे, असे गवंडे म्हणाले.























