४० टक्के अपघात कमी करण्याचा निर्धार
marathinews24.com
पुणे – मद्यप्राशन प्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांची पोलिस आयुक्त आमितेश कुमार यांनी सोमवारी (दि.2) पोलिस मुख्यालयात शाळा घेतली. यावेळी त्यांना खास आपल्या शैलीत सज्जड दम भरून, यापुढे मद्यप्राशन करून वाहन न चालविण्याबाबत कडक इशारा देखील दिला. मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेले एक हजार पेक्षा अधिकजण उपस्थित होते. सस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत समुपदेशन व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अमितेश कुमार बोलत होते. यावेळी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पतीने मोबाईल घेऊन दिला नाही; महिलेची मुलासह आत्महत्या – सविस्तर बातमी
पोलिस आयुक्त म्हणाले, शहरात यापुढे कोणी मद्यप्राशन करून वाहन चालविणार नाही. अशी आमची भूमिका आहे. तुम्ही मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने अपघात घडतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर त्याचे परिणाम होतात याची कल्पना असावी. अशा वाहन चालकांना कायम लक्षात राहील अशी कारवाई पोलिस करतील. त्यांची वाहने तर जप्त करूनच पण त्यांना त्यांचे मित्र, कुटूंबिय यांच्या देखत त्यांचा सत्कार चौकात करून, पोलिसांच्या संकेतस्थळावर देखील त्यांचे फोटो आम्ही प्रसिद्ध करू. मागील दोन वर्षाच्या तुलनेत 2025 मध्ये पोलिसांनी तब्बल सहा हजार वाहन चालकांवर मद्यप्राशन करून (ड्रंक इन ड्राईव्ह) वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यापुढील कालवाधीत सुद्धा पोलिस टार्गेट ठेवून सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे ड्रंक इन ड्राईव्हची कारवाई करतील
मनोज पाटील म्हणाले, शिक्षा देणे हा उद्देश नाही. परंतू तुम्ही वाहतूक नियमांचे पालन नाही केले तर त्याचे परिणाम गंभीर होतात. येथे जमलेले सर्वजन सुपदेशऩ कार्यक्रमानंतर समाजात मेसेंजर म्हणून काम करतील. भारत अपघातात सर्वाधिक पुढे आहे. प्रत्येक वर्षी भारतात 1 लाख 80 हजार नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. म्हणजेच प्रत्येक दिवशी चारशे नागरिक रस्ते अपघातात मृत्यू पावतात. तर सात लाख लोकांना कायमस्वरुपी अपंगत्व येते. याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे.
प्रत्येक आढवड्याला तळीरामांची शाळा
प्रत्येक आढवड्याला पोलिस मुख्यालयात तळीरामांची शाळा पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. त्यांना या समुपदेशन शिबीराला हजरच राहवे लागणार आहे. त्याच बरोबर रॅश ड्रायव्हींग, ट्रीपल शिट दुचाकी चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांची वाहन जप्त करण्याच्या सुचना पोलिसा आय़ुक्तांनी दिल्या आहेत. जो पर्यंत त्यांचे या शिबीरात मनपरिवर्तन होत नाही तो पर्यंत त्यांची वाहने त्यांना परत देण्यात येणार नाहीत.
साहेब माफ करा चुक झाली
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी समोर बसलेल्या काही तळीरामांपैकी दोनांना तुम्ही मद्यप्राशन करून वाहन का चालविले याचा जाब विचारला. त्यावेळी एकाने सांगितले की, साहेब तातडीचे काम निघाले म्हणून गाडी चालविली. तर दुसऱ्याने एका घराकडून दुसऱ्या घराकडे जाताना वाहन चालविले असे सांगितले. दोघांनी देखील आपली चुक झाल्याचे कबूल करत, यापुढे असे कृत्य न करण्याची हमी दिली.
अपघात कमी करण्याचा निर्धार
आम्ही पुणेकरांना आश्र्वासन देऊ इच्छितो की, चालू वर्षात 40 टक्के अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठी मोठ्याप्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. 30 टक्के पेक्षा अधिक अपघात अवजड वाहनांमुळे होतात. शहराच्या मद्यवस्तीत या अवजड वाहनांना बंदी आम्ही घातली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मालकांवर देखील जबाबदारी निश्र्चित करण्यात येणार आहे. त्यांची ब्रेथॲनालायझर चाचणी आणि शारीरीक क्षमता चाचणी झाल्याशिवाय हे ड्रायव्हर गाडीवर बसता कामा नये. पुढील आठवड्यात अपघातातचे गुन्हे दाखल असेलल्या सर्व अवजड वाहनांवरील चालक आणि त्यांच्या मालकांची देखील सुपदेशन शाळा पोलिस घेणार आहेत. असे देखील अमितेश कुमार म्हणाले.
अजित पवारांचे स्मरण कायम राहील
कार्यक्रमांच्या सुरूवातीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, अजित पवारांचे कार्य कायम स्मरणात राहील. गेल्या आठवड्यात याच ठिकाणी त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला होता. पोलिस दलासाठी त्यांनी 300 वाहने दिली. आयुक्तालयाच्या नविन इमारतीचे काम, नवीन पोलिस ठाणी, मनुष्यबळ यासाठी मोठ्याप्रमाणात निधी उपलबद्ध करून दिला. त्यांनी पोलिस दलासाठी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहतील.
लवकरच नवीन अत्याधुनिक डिव्हाईस
ड्रंक इन ड्राईव्हची कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या हातील लवकरच नवीन डिव्हाईस येणार आहे. या डिव्हाईस मार्फत करावाई करताच, त्याचा एक थेट मेसेज पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जाणार आहे. त्यामुळे कारवाई करणाऱ्या पोलिसाने जर एखाद्यावेळी अशा तळीरामावर कारवाई केली नाही तर त्याचे स्पष्टीकरणा पोलिसाला द्यावे लागणार आहे. तसेच या डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचा डेटा देखील जतन होणार आहे. त्याने कितीवेळा वाहतूक नियमाचे उल्लंघन केले हे समजणार आहे.
किर्तनकार म्हणाले साहेब मी दारु पिलो नाही
किर्तनकाराने साहेब मी दारु पिलो नव्हतो. माझ्या गाडीला एकाने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे मी तेथे थांबलो होते. याबाबत मी पोलिसात तक्रार देखील दिली आहे. परंतू ड्रक इन ड्राईव्हच्या कारवाईत माझे नाव आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोरच त्याने हा प्रसंग कथन केला. त्यावेळी तात्काळ चौकशीचे आदेश त्यांनी दिले असता, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले. अपघाताच्या ठिकाणी हे किर्तनकार होते. त्यामुळे त्यांची देखील टेस्ट करण्यात आली. ती टेस्ट निगेटिव्ह आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही खटला दाखल नाही. त्यांचे नाव रजिस्टरला आल्याने त्यांना कॉल गेला. त्यामुळे ते उपस्थित राहिले.
























