खारघर येथे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची जय्यत तयारी

खारघर येथे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची जय्यत तयारी

गुरु तेग बहादुर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जिल्हास्तरावर व्यापक नियोजन

marathinews24.com

पालघर – श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. खारघर, नवी मुंबई येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शासकीय योजनांचा व कायदेविषयक सेवांचा महामेळाव्याचे खेड-राजगुरूनगर येथे आयोजन – सविस्तर बातमी 

मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी दि. ६ फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम सुरळीत, प्रभावी आणि सर्वसमावेशक पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध विभागांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

बैठकीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शिक्षण विभाग, ग्रामपंचायती, पोलीस विभाग, परिवहन विभाग तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यक्रमाची व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, उदासिन आणि भगत नामदेव परंपरा-समाजाची लोकसंख्या ज्या भागात अधिक आहे, त्या भागांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाची सांस्कृतिक छटा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांच्या भक्तीगीतांचे सिनेमागृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी सादरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धा परीक्षा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाची प्रेरणा रुजविण्यावर भर देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागालाही या निमित्ताने “आरोग्य पंधरवडा” राबवून विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सामाजिक ऐक्य, सेवा आणि जनकल्याण यांचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

प्रत्येक विभागाने राबविलेल्या कार्यक्रमांचे Geo-tagged छायाचित्रे व सविस्तर अहवाल gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर नियमित अद्यावत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे धार्मिक स्वातंत्र्य, मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त होणारा “हिंद-दी-चादर” कार्यक्रम हा केवळ स्मरणोत्सव नसून समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सेवा भावनेचा जागर निर्माण करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×