दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीतील शेतकर्यांमध्ये संताप
marathinews24.com
Pune : विद्युत मोटार चोरट्यांचा धुमाकूळ- बोअरवेलसह विहीरीतून विद्युत मोटार बाहेर काढून चोरी करणार्या टोळीने स्वामी-चिंचोली (ता. दौंड) गावात धुमाकूळ घातला आहे. दिवसा रेकी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास चोरट्यांकडून मोटारी चोरून नेल्या जात आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, चोरट्यांना अटकाव करण्याची मागणी केली आहे. अशीच घटना ३० जूनला मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे. चोरट्यांनी सौज उर्जेवर चालणारी इलेक्ट्रॉनिक मोटार चोरून नेली आहे. याप्रकरणी अनिल सोपान कुटे (वय ३९) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सराइताकडून तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त – सविस्तर बातमी
तक्रारदार अनिल कुटे यांची स्वामी चिंचोलीतील शेती असून, गटक्रमांक ५४७ मधील विहीरीत त्यांनी सौज उर्जेवर चालणारी इलेक्ट्रीक मोटार बसविली होती. ३० जूनला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी विहीरीतील मोटार काढून चोरून नेली आहे. त्याच रात्री चोरट्यांनी जवळपासच्या ५ ते ७ विद्युत मोटारींची चोरी केली असल्याची माहिती स्थानिक शेतकर्यांनी दिली आहे. मात्र, तक्रार दाखल करून घेण्यासह पोलिसांनी वारंवार टाळाटाळ केली, असा आरोप काही शेतकर्यांनी केला आहे.
दरम्यान, आतातरी पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीचा शोध घेउन शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. चोरट्यांकडून वारंवार विद्युत मोटारी चोरून नेण्याच्या प्रकारामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी पदरमोड करून दुसरी व्यवस्था करावी लागत आहे.
स्थानिक पोलिसांकडून पेट्रोलिंगला खो
पंढरपूरला चाललेल्या वारकर्यांना कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी लुटल्याची घटना स्वामी चिंचोली गावालगत महामार्गावरील टपरीजवळ घडली होती. त्यानंतर एकाने अल्पवयीन मुलीवर अत्याराच केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. मात्र, रावणगाव पोलिसांसह दौंड पोलीस, महामार्ग पोलिसांकडून पेट्रोलिंग केले जात नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावले असून, वारंवार लुटमारीच्या घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरात नियमबाह्य हॉटेल, ढाबे व्यावसायिकांच्या फाजिल लाडामुळे मध्यरात्रीनंतरही मोठ्या प्रमाणावर टोळक्यांचा धांगडधिंगा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे संबंधिताविरूद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.






















