विषारी दारू मृत्यू प्रकरण
marathinews24.com
पुणे – विषारी दारू मृत्यूप्रकरणात पुणे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तच जबाबदार आहेत. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालत आहेत. दोन्ही पोलीस आयुक्तांचा अवैध धंद्याचा वरदहस्त होता. फुगेवाडी व हडपसरमध्ये विषारी दारूने २३ लोकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी फक्त कनिष्ठ दर्जाच्या अधिकारी, कर्मचार्यांना निलंबित केले. त्यांना बळीचा बकरा बनविण्यापेक्षा दोन्ही पोलीस आयुक्तांची त्वरित बदली करावी. त्यांच्याविरुद्ध विभागीय कारवाई सुरू करणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
शिरुर परिसरात गावठी दारू अड्ड्यावर छापा – सविस्तर बातमी
एस.एम. मुश्रीफ म्हणाले, विषारी दारू प्रकरणी हडपसर व दापोडी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचार्याविरूद्ध कारवाई शुद्ध धुळफेक आहे. कोणत्याही पोलीस आयुक्तालयात किंवा जिल्ह्यात तेथील अधिकार्यांच्या आशिर्वादाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू शकत नाहीत. प्रत्येक पोलीस प्रमुखाकडे विशेष शाखा (गुप्तचर शाखा), गुन्हे शाखा (जिल्ह्यात एल. सी.बी.) असते. संबंधित विभाग फक्त राजकीय माहिती मिळविण्याचे काम करीत नसते. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल अशा गैरप्रकारांची माहिती पोलीस प्रमुखांना देणे हे त्यांचे प्रमुख काम आहे. मात्र, अशापद्धतीने कोणीही काम करीत नाही.
पोलीस प्रमुखाची इच्छा असेल तर, ते अवैध धंदे संपूर्णपणे बंद करू शकतात. पुणे व पिंपरी चिंचवड येथे अवैध धंदे इतक्या मोठ्या प्रमाणावर चालत होते. दोन्ही आयुक्तालयांच्या पोलीस आयुक्तांचा त्यांना वरदहस्त होता. तरी फुगेवाडी व हडपसर येथे विषारी दारूने २३ लोकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांना जबाबदार धरले पाहिजे. त्यांची तत्काळ बदली करून, विभागीय चौकशी करण्याची मागणी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक एस.एम मुश्रीफ यांनी केली आहे.






















